Aurangabad New Name : औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी अपडेट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
Aurangabad Name Change : हायकोर्टाने नामांतराबाबत सरकारला फटकारल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश काढले आहे.
Aurangabad New Name Update : केंद्रीय गृहमंत्रालयाने संमती दिल्यानंतर औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं होतं. त्यानंतर नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबादचं नवं नाव न वापरण्याची निर्देश दिले आहे. हायकोर्टाच्या आदेशाची प्रत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून त्यानंतर आता जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी नवे आदेश काढत महसूल विभागाला पुढील आदेशापर्यंत औरंगाबाद असे नाव वापरण्याच्या सूचना केल्या आहे. जिल्ह्यातील अनेक सरकारी विभागांनी नवं नाव वापरण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं आता अनेक विभागांना कार्यालयातील नावात बदल करावा लागणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
महाविकास आघाडीचं सरकार असताना तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा निर्णय रद्द करत नव्याने नामांतराचा निर्णय घेतला होता. चार महिन्यांच्या कालावधीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने नामांतराच्या निर्णयाला संमती दिली होती. त्यानंतर नामांतराच्या निर्णयावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. हायकोर्टाने निर्देश जारी केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व इतर विभागाशी संबंधित कोणत्याही कार्यालयाच्या नावात बदल करू नये, असे आदेश जारी करण्यात आले आहे.
औरंगाबादच्या नामांतराचा अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी दस्तऐवजांवर औरंगाबादचं नाव बदलू नका, असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला कोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारच्या नामांतराच्या निर्णयाला संमती दिल्यानंतर शहरातील पोलीस आयुक्तालय, न्यायालय, महसूल तसेच टपाल कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर अशा नावाचे फलक लावण्यात आले होते.