'एकनाथ शिंदेंचे बंड अजित दादांसारखे फसणार नाही, कारण…', आठवलेंनी केली कविता
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांना बळीचा बकरा करण्याचा डाव संजय राऊत यांचा होता असा दावाही रामदास आठवले यांनी केला
राज्यात महाविकास आघाडीचा अजेंडा नव्हता त्यामुळेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखील ४० पेक्षा जास्त आमदार बंडात सहभागी झाल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी म्हटलं. राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या महाबंड असून त्यांचाच गट खरी शिवसेना (Shivsena) आहे. महाविकास आघाडी अनैसर्गिक होती आणि बंडाळीमुळे असंतोष बाहेर पडला आहे." रामदास आठवले यांनी यावेळी कवितासुद्धा केली.
आठवलेंनी म्हटलं की, "राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झालेय. शिवसेनेच्या अनेक आमदारांचे मत हे भाजपसोबत युती करण्याचं होतं. पण संजय राऊतांनी (Sanjay Raut) उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) दिशाभूल केली."
आठवलेंनी केलेली कविता -
ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या सत्तेचे बंद केलेले आहे धंदे;
त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत
बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे
आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे,
म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे
शिंदेंचा प्रयोग फसणार नाही
"राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लागला आहे. एकनाथ शिंदेंचा प्रयोग हा अजित पवारांसारखा फसणार नाही. कारण अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेताना नियोजन केले नव्हते. त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयोग फसला होता."असंही आठवलेंनी यावेळी सांगितलं.
शिवसेनेत याआधी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी बंड केले. तेव्हापेक्षा सध्याची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. शिंदेंचा गटच खरी शिवसेना असल्याचं मी मानतो. आता भाजपने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा असंही आठवलेंनी म्हटलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांना बळीचा बकरा करण्याचा डाव संजय राऊत यांचा होता. पण शरद पवार मुरब्बी राजकारणी असल्यानं राष्ट्रपती निवडणूक लढणार नसल्यांच त्यांनी सांगितल्याचंही आठवले म्हणाले.
संबंधित बातम्या