Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली मंत्री शंभुराज देसाईंची भेट; पडळकरांच्या विधानामुळं वेगळीच चर्चा
Parth Pawar meets Shambhuraj Desai : अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
Parth Pawar meets Shambhuraj Desai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी नुकतीच शिंदे सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. या भेटीच्या संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शंका व्यक्त केल्यानं आता राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
पार्थ पवार हे अधूनमधून चर्चेत येत असतात. पार्थ यांनी २०१४ साली मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन मध्यंतरी त्यांनी काही ट्विट केली होती. त्यावरून त्यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. आता त्यांनी शंभुराज देसाई यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला सत्यजीत तांबे यांनी अलीकडंच काँग्रेसच्या विरोधात केलेल्या बंडाचीही किनार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबीयांवर सातत्यानं टीका करणारे भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी या भेटीवरून सूचक वक्तव्य करून या संशयकल्लोळात भर घातली आहे.
‘पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. 'रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडं आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही तेच झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत झाल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळंच ही भेट झाली असावी, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
‘पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल, असं सांगतानाच, ‘त्यांनी शंभुराज देसाईंची भेट नेमकी कशासाठी घेतली आणि त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही,’ हे सांगायला ते विसरले नाहीत.
सुप्रिया सुळे म्हणतात…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या घराबद्दल बोलल्याशिवाय बातमी होत नाही. या निमित्तानं कुणाची बातमी येत असेल, त्यांचा फोटो छापून येत असेल तर चांगलं आहे. तेवढं दिलदार आम्ही राहिलं पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी पडळकर यांना हाणला.
विभाग