मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गोपीनाथ मुंडेंमुळंच महाराष्ट्रात भाजपचा विस्तार झाला; मित्राच्या आठवणीत नितीन गडकरी भावूक
Nitin Gadkari On Gopinath Munde
Nitin Gadkari On Gopinath Munde (MINT_PRINT)

गोपीनाथ मुंडेंमुळंच महाराष्ट्रात भाजपचा विस्तार झाला; मित्राच्या आठवणीत नितीन गडकरी भावूक

18 March 2023, 21:57 ISTAtik Sikandar Shaikh

Nitin Gadkari Speech : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी शेतकरी, शेतमजूर, दलित आणि ओबीसींनी भाजपमध्ये आणून पक्ष मजबूत केल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

Nitin Gadkari On Gopinath Munde : महाराष्ट्रातील वंचित घटकांसाठी समर्पित भावनेनं काम करणारे गोपीनाथ मुंडे हे एक प्रकारे योद्धाच होते. संघर्ष यात्रा काढून त्यांनी महाराष्ट्र जागवला. राज्यातील अनेक विकासकामांना यशस्वीपणे पूर्ण करण्यातही मुंडेंचा सिंहाचा वाटा होता, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नाशिकच्या सिन्नरमधील नांदूर-शिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उपस्थितांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राज्यातील सिंचनाच्या प्रश्नांवर गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच आवाज उठवला. अविकसित भागांमध्ये पाणी पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक कामं केलीत. मी भाजपचा अध्यक्ष झालो तेव्हा फक्त दोनच लोकांना वाकून नमस्कार करायचो. त्यात एक लालकृष्ण आडवाणी आणि दुसरे गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता, त्यामुळं राज्याच्या विकासात गोपीनाथ मुंडे यांचं योगदान न विसरता येण्यासारखं असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा वसा आणि वारसा सध्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या करीत आहेत. पंकजा आणि प्रीतम यांना सर्व क्षेत्रात प्रचंड यश मिळेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

मुंडेंनी अठरापगड जातींना एकत्र आणलं- मुख्यमंत्री

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संघटन कौशल्य, अभ्यास आणि प्रभावी वक्तृत्वाचा आधार घेत राज्यातील अठरापगड जातींना एकत्र आणण्याचं काम केलं. अनेक माणसं जोडली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरपूर प्रेम होतं. ते आम्ही जवळून बघितलं आहे. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलणारे नेते होते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.