Raj Thackeray : काय सोडावं आणि काय धरावं अशी मनसेची स्थिती; रुपाली ठोंबरे पाटील यांचा वर्मावर घाव
Rupali Thombare Patil on MNS : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर मनसे व राज ठाकरे मौन बाळगून का आहेत, असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
Rupali Thombare Patil on MNS : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह राज्यातील महापुरुषांचा भाजपकडून होत असलेल्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांसह अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनी मुंबईत आज महामोर्चा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात शाब्दिक टोलेबाजीला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल करतानाच मनसे व राज ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी रुपाली ठोंबरे पाटील या देखील मुंबईतील महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे गट व भाजपवर टीका केलीच, शिवाय मनसेचाही समाचार घेतला. 'मनसेची सध्याची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप 'जय' निघतं तो मराठी माणूस, असं राज ठाकरे अनेकदा आपल्या भाषणात सांगत असतात. राज ठाकरे यांच्या याच विधानाचा उल्लेख करत ठोंबरे पाटील यांनी राज यांच्यावर निशाणा साधला. 'राज्यपालांनी व भाजपच्या लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान करूनही मनसेचे लोक गप्प आहेत. जनता इतकी दूधखुळी आहे का?,' असा सवाल रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना केला.
रुपाली ठोंबरे पाटील या पुण्याच्या राजकारणात सक्रिय असून काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याआधी त्या मनसेत सक्रिय होत्या. आक्रमक वक्त्या असलेल्या रुपाली पाटील या मनसेचा चेहरा होत्या. मनसेच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात केलेली अनेक जनआंदोलनं गाजली होती. मात्र, पक्षांतर्गत राजकारण व वरिष्ठांच्या उदासीनतेला कंटाळून त्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर आता त्यांनी थेट मनसेच्या मराठी अस्मितेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विभाग