Jitendra Awhad: हे मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय?; शिंदे गटाच्या 'ठाणे बंद'वर जितेंद्र आव्हाड भडकले!
Jitendra Awhad on Thane Bandh : शिंदे व भाजप गटानं पुकारलेल्या ठाणे बंदवरून जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Jitendra Awhad attacks Eknath Shinde : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्ष व शिंदे गटानं अचानक ठाणे व डोंबिवली बंद पुकारला आहे. या बंदविरोधात ठाणेकरांमध्ये तीव्र नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ठाण्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या बंदविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ते पत्रकारांशी बोलत होते. 'मुख्यमंत्र्यांच्या गटानंच एखादं शहर बंद करणं हा बालिशपणा आहे. मुख्यमंत्र्यांचं हृदय विशाल सह्याद्रीसारखं असायला हवं. उलट मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना देऊन हा बंद थांबवायला पाहिजे होते. बंद होऊ देऊ नका. वातावरण चांगलं राहू द्या. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांशी स्वत: मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवं होतं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
'शिंदे गटाचे आणि भाजपचे लोक बळजबरीनं दुकानं बंद करत आहेत. काही रिक्षावाल्यांनी मारहाण झाली आहे. सत्ताधारी पक्षानं असं वागणं शोभत नाही. हे मुख्यमंत्री आहेत की व्हाइसरॉय, असा सवाल आव्हाड यांनी केला.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला आडकाठी म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे का, असं विचारलं असता, ते स्पष्ट दिसत आहे असं आव्हाड म्हणाले. ठाण्यातून मोठ्या संख्येनं बस महाविकास आघाडीच्या महामोर्चाला जाणार आहेत. अशा वेळी बळजबरी करून एखाद्या शहरात बंद करणं हे लोकांना वेठीस धरण्यासारखं नाही काय? सुरुवातीला त्यांनी पोलिसांमार्फत बंद करून पाहिला, पण गृहमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली आणि मोर्चा होण्यात अडचण नाही अशी भूमिका मांडली. त्यानंतर आता हा मोर्चा होत आहे, असं आव्हाड म्हणाले.