मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : संभाजीनगरमधील हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sharad Pawar : संभाजीनगरमधील हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 01, 2023 07:49 PM IST

Sharad Pawar : बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरात दोन गटात मोठा राडा झाला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

Sharad Pawar On Sambhaji Nagar Voilence
Sharad Pawar On Sambhaji Nagar Voilence (HT_PRINT)

Sharad Pawar On Sambhaji Nagar Voilence : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री दोन गटात जोरदार राडा झाला होता. यावेळी समाजकंटकांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहनांची जाळपोळ केली होती. छत्रपती संभाजीनगरसह मुंबईतील मालवणी भागातही दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता या दोन्ही प्रकरणांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील कोणत्याही शहरात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी लोकप्रतिनिधींनी घ्यायला हवी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोनदिवसीय नागपुरच्या दौऱ्यावर आलेले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार बोलताना म्हणाले की, अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईच्या मालवणीत काही प्रकार घडले आहे. या दोन्ही घटनांना धार्मिक स्वरुप आहे की काय?, अशी चिंता वाटण्याची स्थिती होती, असं पवारांनी म्हटलं आहे. हिंसाचाराच्या प्रकरणांवर राज्यातील अनेक लोकांनी मतं व्यक्त केली आहेत. परंतु त्यावर अधिक चर्चा होणं योग्य नाही. आता तेथील परिस्थिती निवळली असून हा धार्मिक प्रश्न पुढे राहणार नाही, याची काळजी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी घेण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अनेक लोकांना एकमेकांवर आरोप करण्याची संधी अनेकवेळा असते. परंतु ज्यावेळी धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा राजकीय नेत्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. संभाजीनगर येथील हिंसाचारावर राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्यातील दोन बड्या नेत्यांची नागपुरात भेट...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे बडे नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये ऊसशेती, कारखानदारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point