नागपूर हादरले, २४ तासात तीन खून; सर्व प्रकरणातील संशयित आरोपींना अटक
Nagpur Crime News: नागपूरमध्ये गेल्या २४ तासात तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime News: नागपूरमध्ये २४ तासात तिघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरच्या इमामवाडा इथं दोन मजुरांनी त्यांच्या मित्राची हत्या केल्याचा प्रकार घडला. त्यानतंर पाचपावली इथं तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तर पोलिसांचा खबरी असल्याने दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी तिन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
इमामवाडा इथं रामसिंग ठाकूर नावाच्या व्यक्तीचा किरकोळ वादातून दोन मजुरांनी खून केला. तिघेही इमामवाडा झोपडपट्टीत एकत्र राहत होते. दारुचे व्यसन असणाऱ्या या तिघांमध्ये काही कारणाने वाद झाला आणि त्यातूनच राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यात वार केले. त्यानंतर रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता.
पाचपावली इथं २२ वर्षीय रोशनची हत्या करण्यात आली. चाकू आणि लोखंडी रॉडने झालेल्या हल्ल्यात रोशनचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी विरेंद्र बकरी, यशोदास आणि अश्विन अशा तिघांना अटक केलीय. रोशनचा या तिघांसोबत वाद झाला होता.
नागपूरमध्ये बुटीबोरीच्या टाकळघाट इथं सुनील भजे यांची हत्या झाली. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी त्याचा खून केला. या प्रकरणी दिलीप गेडा आणि वंश मांझी यांना अटक केली आहे. दोघांनी सुनीलवर लोखंडी रॉडने हल्ला केला.