Refinery Project : स्थानिकांचा विरोध असताना दडपशाही सुरू; सत्ताधारी रिफायनरीचे दलाल- विनायक राऊत
Refinery Project In Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधारी दलाली करत असल्याचा धक्कादायक आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे.
Refinery Project In Ratnagiri : नाणारमधील रिफायनरी प्रकल्प रद्द करत आता तो राजापूर तालुक्याल्या बारसू गावात उभारण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे, त्यासाठी जमिनीच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनानं तयारी केली असून त्याला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केल्याचं पाहायला मिळालं आहे. याशिवाय सकाळी भाजप नेते निलेश राणे हे स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांनाही स्थानिकांनी घेराव घातला होता. त्यामुळं आता कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकीय वादंग पेटलं आहे. त्यातच आता रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे रिफायनरी प्रकल्पाचे दलाल आहेत, त्यांनी आता नाणारनंतर बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्पाचा घाट घातला आहे, या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, सरकारच या प्रकल्पाचे दलाल असल्यानं स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये, पोलिसांची दादागिरी सुरू असून जवळपास ४०० लोकांना तडीपारीच्या नोटिशी देण्यात आल्या आहेत, सरकार आणि रिफायनरीच्या दलालांकडून नागरिकांवर दबाब आणला जात असून शिवसेना स्थानिकांच्या पाठिशी असल्याचं सांगत राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
रिफायनरी जनतेच्या नाही तर भूमाफियांच्या हिताची...
राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून २२४ मारवाडी आणि गुजरात्यांनी राजापूर तालुक्यात जमिनी विकत घेतल्या आहेत, मी हे सिद्ध केलं आहे, केंद्र आणि राज्य सरकारच या रिफायनरी प्रकल्पात दलाली करत असल्यानं हा प्रकल्प जनतेच्या नाही तर भूमाफियांच्या हिताचं असल्याची टीका खासदार विनायक राऊतांनी केली आहे.