Raj Thackeray : ‘देश की बेटियाँ’ ना न्याय द्या, सन्मानाने तोडगा काढा, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
RajThackeraylettertopmNarendramodi : कुस्तीपटूंच्या आंदोलन प्रकरणी सन्मानजनक तोडगा काढा आणि भारतीय क्रीडा जगताला आश्वस्त करा,अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून पंतप्रधानांकडे केली आहे.
मुंबई – दिल्लीतील जंतर मंतरवर भारतीय कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रृजभूषण चरणसिंग यांच्यावर कारवाईची मागणी करत विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. महिला कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
सरकारकडून आंदोलन दडपण्यासाठी कुस्तीपटूंची धरपकड करण्यात आली. त्यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी त्यांना ऑलिम्पिकमध्ये मिळालेली मेडल गंगेमध्ये बुडवण्याचाही इशारा दिला होता. आज मोदी सरकारने इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांना दिला होता.
याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी सन्मानजनक तोडगा काढा आणि भारतीय क्रीडा जगताला आश्वस्त करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्रातून पंतप्रधानांकडे केली आहे.
राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र -
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' या नात्याने आपण या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.
ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.
ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीतही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.