Weather Forecast: महाराष्ट्रात मान्सून आधीच पाऊसाच्या सरी कोसळणार? काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार, हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती महत्त्वाची ठरेल.
Maharashtra Rains: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली असून उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे राज्यात मान्सून कधी दाखल होणार, याची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, जोपर्यंत मुंबईमध्ये पश्चिमेकडून वारे येणार नाहीत, तोपर्यंत तापमानात घट किंवा उकाडा कमी होण्याची शक्यता फार कमी आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग न्यूज
सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवसांत वाऱ्याची दिशा बदलेल. वायव्येकडूनही वारे वाहणार असल्याने नागरिकांना आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. जोपर्यंत मुंबईमध्ये पश्चिमेकडून वारे येणार नाहीत, तोपर्यंत तापमानात घट किंवा उकाड्याच्या जाणीवेत घट होण्याची शक्यता नाही, असेही सुषमा नायर यांनी म्हटलंय.
राज्यात मंगळवारी काही भागात पाऊस पडला. मराठवाड्यावरून जाणारा पश्चिमी प्रकोप आणि ढगांची द्रोणीय स्थितीमुळे पाऊस पडल्याचे सांगितले जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात एक प्रणाली तयार होत आहे. ज्यामुळे मान्सूनपूर्वीच पावसाच्या सरी अनुभवता येतील. मात्र ही प्रणाली कशी प्रवास करते यावर पावसाची शक्यता अवलंबून आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात मंगळवारी (३० मे २०२३) दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. या भागातील शेकडो घरांचे छप्पर उडून नागरिकांचा संसार उघड्यावर आला. घरावरील पत्रे उडून तसेच अंगावर झाड पडल्याच्या घटनेत दहा ते बारा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भिवंडी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विभाग