Kasaba Bypoll : कसबा निवडणुकीसाठी भाजप कडून 'या' पाच नावांची शिफारस; उमेदवारी कुणाला मिळणार ?
Kasaba Bypoll BJP News : पुण्यातील कसबा पेठेच्या पोटणीवडणुकीसाठी भाजपने पक्षप्रमुखांकडे तब्बल पाच नावांची शिफारस केली आहे. या पैकी कुणाला भाजप कडून उमेदवारी मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुणे : पुण्यातील कसब्याची पोटनिवडणुक रंगदार होणार आहे. येथील उमेदवारीचा पेच सुटला नसतांना आता भाजपने केंद्रीय निवड समितीकडे ५ नावांचा शिफारस प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पुढे येत आहे. यात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील २ नावांची चर्चा आहे. शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच नाव पाठवण्यात आलं असून त्याचबरोबर धीरज घाटे, हेमंत रासने आणि गणेश बिडकर यांच्या नावाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. येत्या 3 दिवसांत यांच्या पैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती निश्चित केली आहे. कसब्यातील एका नगरसेवकाला एक शक्तिकेंद्र दिले जाणार आहे. भाजपने केलेली विकासकामांची माहिती पत्रकाद्वारे प्रत्येक घरात पोहोचविण्याचे सध्या नियोजन सुरू आहे. येथील पोटणीवडणुकीसाठी पुढील महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपकडून कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रीतथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून यावेळी त्यांनी कसबा आणि पिंपरी-चिंचवड निवडणुकी विषयी रणनीती ठरवली तसेच या बाबत कार्यकर्त्यांना सूचना देखील दिल्या.
या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नावे प्रदेश भाजपकडे पाठविण्यात आली आहेत. इच्छुक उमेदवारांमधून तीन नावे निश्चित करून प्रदेश भाजपकडून ती केंद्रीय संसदीय समितीला पाठविली जातील. यातील एक नाव निश्चित होईल. ही प्रक्रिया दोन फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होईल, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे. मात्र उमेदवार कोण असेल, हे दिल्लीतूनच ठरेल, असे देखील पाटील म्हणाले.
दरम्यान, कसबा पोटणीवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते आणि नेते अॅक्टिव झाले असून पक्षाची कामे घरोघरी पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
विभाग