NCP च्या माजी नगरसेवकांना आमिषाची कोटीच्या कोटी उड्डाणे.. जितेंद्र आव्हाडांचा शिंदे गटावर आरोप
Ncp leader Jitendra awhad : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना फोडण्यासाठी पैशाचा वापर केला जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कळवा-मुंब्य्रातील माजी नगरसेवकांना एक कोटी देण्याबरोबरच नगरसेवक निवडणुकीत तिकीट देण्याचे आणि प्रभागात १० कोटींची कामे देण्याचे आमिष दाखवून शिंदे गटाकडून राष्ट्रवादी फोडण्याचे काम केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी पक्षातील प्रभावी नेत्यांना गळाला लावण्याची रणनिती मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून आखली जात आहे. मुंब्य्रातील व कळव्यातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात असून त्यांना शिंदे गटाची फूस असल्याची चर्चा आहे. शरद पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे लोकमान्यनगर भागातील पक्षाचे नेते हणमंत जगदाळे यांच्यासह तीन नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.
पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला एक कोटी देतो,तुझ्या पत्नीला एक कोटी देतो, अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला १० कोटी रुपयांची कामे देतो. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.