मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde: सोशल मीडियात लाइक्स किती यावर नेता ठरत नाही; पंकजा मुंडे यांचा टोला कुणाला?

Pankaja Munde: सोशल मीडियात लाइक्स किती यावर नेता ठरत नाही; पंकजा मुंडे यांचा टोला कुणाला?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 12, 2022 01:37 PM IST

Pankaja Munde at Gopinath Gad: गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्तानं गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मुंडे समर्थकांशी संवाद साधला.

Pankaja Munde
Pankaja Munde

Pankaja Munde at Gopinath Gad: ‘सोशल मीडियात किती लाइक्स आहेत, किती फॉलोवर्स आहेत. एखाद्याकडं किती पैसा आहे, यावर नेता ठरत नाही. नेत्यानं आवाज दिल्यावर त्याच्यासाठी किती लोक उभे राहतात यावर नेता ठरतो,’ असं प्रतिपादन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज केलं. त्यांचा रोख नेमका कुणाकडं होता यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्या निमित्तानं गोपीनाथ गडावर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कार्याला आणि विचारांना यावेळी पंकजा यांनी उजाळा दिला.

महापुरुषांच्या अपमानावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. जिथं कोणी बोलत नाही, तिथं बोलण्याची हिंमत दाखवतो आणि जिथं सगळेच बोलत असतात. श्रेय घेण्यासाठी धडपड करत असतात, तिथं मौन बाळगतो, तो खरा नेता असतो, असं सांगून पकंजा म्हणाल्या, ‘महापुरुषांबद्दल बोलण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी बोलावं. त्यांचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यांचा संघर्ष आपल्यापैकी कुणीही पाहिलेला नाही. असं चुकीचं बोलणाऱ्यांचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, एखादी व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलत असताना त्याच्याकडून बोलण्याच्या ओघात काहीतरी चूक झाली तर तेवढ्याच गोष्टीचं भांडवल करायचं हा सुद्धा महापुरुषांचा अपमानच आहे,’ असं पंकजा म्हणाल्या.

मला जे हवं, ते मी मिळवलंय!

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून त्यांना सत्तेचं कुठलंही पद मिळालेलं नाही. विधान परिषदेवरील आमदारकीनंही त्यांना अनेकदा हुलकावणी दिली आहे. त्यामागे पक्षांतर्गत राजकारण असल्याचं बोललं जातं. नव्या सरकारच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या अनुषंगानंही त्या बोलल्या. ‘मला जे हवं आहे, ते मी मिळवलंय. मी सांगितलं तर हजारो लोक एकत्र येतात. जोश जल्लोष करतात. मी सांगितलं तर हजारो लोक मौन बाळगतात. हा अधिकार आणि प्रेम मी मिळवलंय,’ असं पंकजा यावेळी म्हणाल्या.

IPL_Entry_Point

विभाग