Ashish Shelar : वरळीतही आमच्या पाठिंब्यावरच निवडून आलात, शेलारांचे शिवसेनेवर टीकांचे बाण
दहीहंडीच्या कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केला. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे तसेच वरळीतही आमच्या पाठिंब्यावरच निवडून आला आहात हे विसरू नका असे शेलारांनी म्हटले आहे.
Ashish Shelar on Shiv Sena : आज राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मुंबई, ठाण्यातही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ वरळीमध्येही भाजपकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर सडकून टीका केला. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे तसेच वरळीतही आमच्या पाठिंब्यावरच निवडून आला आहात हे विसरू नका असे शेलारांनी म्हटले आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सवामध्ये बोलताना शेलार यांनी शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत वरळीच नव्हे तर पूर्ण मुंबईवर भाजपचे कमळ फुलणार आहे. शिवसेना पक्ष हिंदू सणांना विसरला आहे. हिंदुत्व विसरला आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले आहेत. त्यामुळे वरळी जांभोरी मैदानात त्यांनी साधी परवानगी देखील घेतली नाही. वरळीतच नाही तर संपूर्ण मुंबईत भाजपची सत्ता येणार आहे. आमच्याच पाठिंब्यावर वरळीत तुम्ही निवडून आलात विसरू नका, असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.
आशिष शेलार यांनी घाटकोपर येथील राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी शेलार यांनी शिंदे सरकारचं कौतुक केलं. शेलार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद! कारण त्यांनी निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात उत्साह पाहायला मिळत आहे.
शिवसेनेवर टीका करताना शेलार म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडलं आहे. मराठी माणसांचे सण त्यांनी मागे टाकले. वरळीतच नाही तर संपूर्ण मुंबईत भाजपच सत्ता येणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आमच्या पाठिंब्यावर वरळीत देखील निवडून आलात विसरू नका, असा टोला शेलार यांनी शिवसेना व आदित्य ठाकरे यांना लगावला.