BJP Mumbai: मुंबईतील राजकीय संघर्षाची नांदी! शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘जागर’
Mumbai Municipal Elections 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 'जागर मुंबई'ची सुरुवात केली आहे.
Mumbai Municipal Elections 2022 : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता भाजपनं मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पालिकेत विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून 'जागर मुंबईचा' या विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपची पहिली जाहीर सभा भाजप नेते आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पूर्व मध्ये होणार आहे. त्यामुळं आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजप नेते आशिष शेलार यांनी पक्षाच्या या विशेष मोहिमेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मुंबईत मतांसाठी तुष्टीकरणाचं राजकारण सुरू असून पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची भलती ‘उठा’ठेव सुरू असून याविरोधात भाजपनं जागर मुंबईचा ही मोहिम सुरू केली आहे. या अभियानातील पहिली सभा येत्या सहा नोव्हेंबरला वांद्र्यात होणार असल्याची माहिती शेलारांनी दिली आहे. भाजपच्या या सभेला खासदार पूनम महाजन आणि आमदार पराग अळवणी यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं माघार घेतल्यानंतर शिवसेनेनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानंही पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळं आता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.