फडणवीस सारथी, शेलार अर्जुन... भाजप मुंबईत विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडेल; बावनकुळेंनी सांगितला फॉर्मुला
Chandrashekhar Bawankule on BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयाचे सर्व रेकॉर्ड मोडेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
Chandrashekhar Bawankule on BMC Election : मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. 'वातावरण उत्तम, नेतृत्व सक्षम आणि केंद्रात व राज्यात निर्णायक सरकार असल्यामुळं ‘अभी नही तो कभी नही', असा संदेशच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज कार्यकर्त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं विश्वव्यापी नेतृत्व, देवेंद्र फढणवीस यांच्यासारखा सारथी आणि आमदार आशिष शेलार यांच्यासारखा अर्जुन आपल्याकडं आहे. त्यामुळ भाजप यावेळी आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबई भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील सर्व खासदार, आमदार व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 'खिशाला पेन नसलेले एमकेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपानं महाराष्ट्रात झाले. त्यांनी कधी कुठल्या पत्रावर शेरा मारला नाही. त्यामुळंच ४० आमदार त्यांना कंटाळून गेले. उद्धव ठाकरे यांनी पत्रावर मारलेला शेरा दाखवा व एक हजार रुपये मिळवा, असा खोचका टोलाही बावनकुळे यांनी यावेळी हाणला.
'फडणवीस हे असं नेतृत्व आहे जे प्रत्येक पत्रावर आदेश लिहून प्रशासनाला निर्देश देत राहतात. जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारं नेतृत्व आपल्याकडं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो लोक भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या किंचित सेनेचे पदाधिकारी त्यांना एवढे कंटाळले आहेत की ते आपली वाट पाहत आहेत. त्यामुळं कामाला लागा. प्रत्येक बुथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी घडवून आणावेत. प्रत्येक पदाधिकाऱ्यानं २ हजार घरी पोहोचणं अपेक्षित आहे. ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरूपात कामाला लागायचं आहे. येणारा काळ हा आपला आहे, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
'एक अकेला' मुंबईमध्ये सगळ्यांना भारी पडणार - शेलार
हिंदुस्तान देख रहा है, एक अकेला सबको भारी पड रहा है... राज्यसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित केली. त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा एक मोदी सगळ्यांना भारी पडतील, असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केला. सगळे विरोधक केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीनं एकत्र आले आहेत. शिवसेना भाजप सोबत होती, तेव्हा त्यांच्याकडं मतदार होते आणि आमदारही होते. भाजपशी गद्दारी केल्यापासून ना त्यांच्याकडं नेतृत्व आहे, ना मतदार आहेत, ना आमदार आहेत, असा टोला शेलार यांनी हाणला.