Udayan Raje Bhosle : शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता, तुमची लायकी आहे का? उदयनराजेंनी सुनावलं
Udayan raje Bhosle on bhagat singh koshyari : महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. असा टोला उदयनराजेंनी राज्यपाल कोश्यारींना लगावला आहे.
Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे यांनी मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना चांगलंच सुनावलं आहे. देशात एक ते भगतसिंग होते, जे देशासाठी शहीद झाले आणि दुसरे हे भगतसिंह यांनी त्या पदावर राहताना तारतम्य बाळगले पाहिजे.. उद्या कोणी पण अरे तुरेची भाषा वापरेल. शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करतात.. तुमची लायकी काय आहे? शिवाजी महाराज यांनी जे केलं, तिथे आपण पोहोचू देखील शकत नाही, अशा शब्दांत उदयनराजेनी कोश्यारींना सुनावलं.
शिवाजी जुने आदर्श होते, राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर उदयनराजे संतप्त झाले होते. तसेच पत्रकार परिषदेतच भावुक झाले होते. त्यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज राज्यपाल कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले की, राष्ट्रपती जसे देशाचे प्रमुख असतात तसेच राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्वाचा पदावर असणाऱ्या व्यक्तींनी, मग कुणीही असो, त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे. महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. महापुरुषांबद्दल वाईट बोललं तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतो. हे कशा करता? जगात अनेक महाराजे होऊन गेले, पण शिवाजी महाराज आणि त्यांच्यात मोठा फरक होता. तो म्हणजे, ते महाराजे स्वत:च्या साम्राज्याठी लढले आणि आपल्या शिवाजी महाराजांनी युध्द केलं ते लोकांसाठी केलं.
उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी लोकशाहीची चौकट तयार केली. कारण, लोकांचा राज्य कारभारामध्ये सहभाग असावा आणि त्यातूनच मग लोकशाहीची निर्मिती झाली, असं स्पष्ट मत उदयनराजेंनी व्यक्त केले. आज जगात अनेक देश आहेत, जिथं आपल्याला राजेशाही पहायला मिळते. पण, लोक त्या संपूर्ण प्रक्रियेत आले पाहिजेत म्हणून, छ. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली. कोणत्याही जाती-धर्मात मतभेद केले नाहीत. सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळं देशाचे अनेक तुकडे झाले आहेत. आपण खोलवर या सगळ्याचा विचार केला पाहिजे. असंही उदयनराजे म्हणाले.