शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर खपवून घेणार नाही - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray at Byculla: शिवसैनिकांवरील हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भायखळा शाखेला भेट दिली. तिथं त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला व हल्लेखोरांवर कारवाई होत नसल्याबद्दल पोलिसांना जाबही विचारला.
Uddhav Thackeray at Byculla: मुंबईतील भायखळ परिसरात काल दोन शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज भायखळा शाखेला भेट देऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पोलिसांना राजकारणात न पडण्याचा सल्ला दिला. ‘शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तरी पोलीस जबाबदार राहतील,’ असा इशारा त्यांनी दिला.
शिवसैनिक बबन गावकर आणि विजय कामतेकर यांच्या कारवर गुरुवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. २०८ ला भेट दिली. यावेळी संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग कथन केला. हल्ल्यानंतर आमची तक्रारही पोलिसांनी घेतली नाही, अशी व्यथा त्यांनी सांगितली. त्यावर इथल्या पोलिस ठाण्याचे इनचार्ज कोण आहेत, असं विचारत पोलिसांनी राजकारणात पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केलं.
'राजकारणात तुम्ही पडू नका, जे राजकारण करायचं ते आम्ही करू. लढायचं ते लढू. पण जिवाशी खेळ होणार असेल तर शांत बसणार नाही. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर पोलीस जबाबदार राहतील. शिवसैनिकांचं रक्त सांडू नये म्हणून मी शांततेचं आवाहन करतोय. तुम्हाला जमत नसेल तर हात वर करा, आमचे शिवसैनिक स्वत:चं रक्षण करायला समर्थ आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हल्ला होऊनही शिवसैनिकांना संरक्षण न दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे, त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं. ‘हल्ल्यात त्यांचाच हात आहे असा सुगावा पोलिसांना लागलाय का? तसं नसेल तर त्यांना संरक्षण का दिलंय? त्यांना बोलावून त्यांची चौकशी का केली जात नाही? अशी प्रश्नांची सरबत्तीच उद्धव ठाकरे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर केली. ‘राज्याचा कारभार सध्या ज्या उपमुख्यमंत्र्यांकडं आहे, त्यांना विचारा. शिवसैनिकांना त्यांना संरक्षण देता येत नसेल तर आम्ही ते करू,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या