मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नाही का?; काँग्रेसचा एकनाथ शिंदेंना सवाल

'तो' निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नाही का?; काँग्रेसचा एकनाथ शिंदेंना सवाल

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 15, 2022 04:11 PM IST

Emergency Pension Scheme: आणीबाणीच्या विरोधात लढणाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

Balasaheb Thackeray-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Balasaheb Thackeray-Devendra Fadnavis-Eknath Shinde

Congress questions Eknath Shinde over Emergency Pension Scheme: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचा धडाका लावला आहे. आणीबाणीमध्ये कारागृहात गेलेल्या व्यक्तींना पेन्शन देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसनं एकनाथ शिंदे यांच्या हेतूवरच शंका व्यक्त केली आहे. हा निर्णय बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. त्यांच्याच विचारानं आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीशी फारकत घेण्याची आमची भूमिका बाळासाहेबांच्या विचाराशी सुसंगत आहे, असा दावा एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत गेलेले बंडखोर आमदार सातत्यानं करत आहेत. मात्र, औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतल्यानं संभ्रम निर्माण झाल आहे. त्यातच आणाबाणीविरोधात लढणाऱ्या पेन्शनच्या निर्णयावरून आता सचिन सावंत यांनी शिंदे यांना घेरलं आहे.

‘बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं असे सांगणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात निर्णय होताना मूक साक्षीदार होतात हे दुर्दैव आहे. बाळासाहेबांचा आणीबाणीला पाठिंबा होता, मग आणीबाणीत कारागृहात गेलेल्यांना पेन्शनचा निर्णय बाळासाहेबांच्या विरोधातील नव्हे का?,’ असा सवाल सावंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.

'स्वातंत्र्यलढ्यात कोणतंही योगदान नसणारे देशभक्तीचा बाजार मांडून सहानुभूती मिळवण्याचा सतत फुटकळ प्रयत्न करत आहेत. हा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य चळवळीला कमी लेखून संघाचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. खरंतर बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळं संघाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पेन्शन घेण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यातही समाजवादी व इतर विचारांच्या आणीबाणीचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पेन्शन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळं ही योजना केवळ संघाच्या स्वयंसेवकांसाठीच आहे, शिवसेनेसाठी नाही, याकडंही सचिन सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या