मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar On Vidarbha: वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, कितीही आले आणि गेले तरी...

Ajit Pawar On Vidarbha: वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, कितीही आले आणि गेले तरी...

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 20, 2022 05:14 PM IST

Ajit Pawar On Vidarbha: अजित पवार यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. तसंच राज्यात होत असणाऱ्या वैयक्तिक टीकेवरून नाराजीही व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार (PTI)

Ajit Pawar On Vidarbha: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुंबईत जनता दरबारासाठी उपस्थित राहिले होते. यानतंर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. तसंच राज्यात होत असणाऱ्या वैयक्तिक टीकेवरून नाराजीही व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, तुमच्या - माझ्या देशात व महाराष्ट्रात जे महागाईचे, बेरोजगारीचे व कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. आता देशात चित्ते आले ठिक आहे. ते वाढावेत,पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा. तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी अजून किती लाख कोटीची गुंतवणूक येणार हे सांगा असा प्रश्नही विचारला.

वेदांता कुणामुळे गेला याची चौकशी करा
वेदांतासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. मात्र त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये असेही अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले. काही पक्षातील लोक वेगळया मागण्या किंवा डिमांड केली होती म्हणून प्रकल्प गेला असे स्टेटमेंट करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही कारण नसताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. तरीपण चौकशी करायची असेल तर जरुर करा 'दूध का दूध, पानी का पानी' होऊन जाऊद्या असे थेट आव्हानच अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिले.

शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी
नैसर्गिक आपत्तीचे पैसे नुकसानग्रस्तांना मिळालेले नाही. एनडीआरएफचे निकषाप्रमाणे जास्तीचा पाऊस पडल्यानंतर जी काही मदत करायला हवी किंवा अधिवेशनामध्ये सरकारने जी काही मदत जाहीर केली होती. त्याअनुषंगाने पुढच्या मदती जाहीर केल्या पाहिजेत. परंतु त्या होत नाही ही शेतकऱ्यांची खंत आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी अजित पवार यांनी केली.

तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही
सध्या पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारले असता अजित पवार यांनी सांगितले की, "वेगळया विदर्भाबाबत जी चर्चा सुरू आहे त्याला तुम्ही महत्त्व देऊ नका. जोपर्यंत स्थानिक जनता वेगळ्या विदर्भासाठी पाठिशी उभी राहत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कितीही आले आणि कितीही गेले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही."

बारामतीकर स्वागत करतील आणि बटण कोणतं दाबायचं तेही दाखवतील
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामतीत येणार असल्याच्या प्रश्नावर त्यांनी खोचक टोला लगावला. अजित पवार म्हणाले की,"बारामतीत त्यांचे स्वागत आहे. कुणालाही कुठेही जायचा अधिकार आहे. अजून कुणाला यायचं असेल त्यांनी यावं बारामतीकर त्यांचं मनापासून स्वागत करतील आणि वेगवेगळ्या निवडणूकीत कुणाची बटनं दाबायची ते दाखवतील."

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या