TMKOC: करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या! ‘तारक मेहता..’च्या ‘बावरी’चे पुन्हा गंभीर आरोप
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मोनिकाने २०१३ ते २०१९ अशी सहा वर्षे या हिट मालिकेमध्ये तिने ‘बावरी धोंडुलाल कानपुरिया’ची भूमिका साकारली होती.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका सध्या मोठ्या वादांत अडकली आहे. या मालिकेच्या निर्मात्यावर अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल यांनी लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर आता काही दिवसांनी या शोमध्ये ‘बावरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरियानेही निर्माते असित कुमार मोदी आणि प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी यांच्यावर छळाचे धक्कादायक आरोप केले आहेत. मोनिकाने २०१३ ते २०१९ अशी सहा वर्षे या हिट मालिकेमध्ये तिने ‘बावरी धोंडुलाल कानपुरिया’ची भूमिका साकारली होती. आता तिने पुन्हा एकदा ‘तारक मेहता..’च्या मेकर्सवर आरोप केले आहेत.
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने हा शो सोडल्यानंतर निर्मात्यांनी तिचा एक वर्षाचा पगार देण्यास सरळ नकार दिला होता. गुरचरण सिंह, जेनिफर मिस्त्री, राज अनादकत आणि शैलेश लोढा यांसारख्या शो सोडलेल्या लोकांनाच्याही नशिबी अशाच गोष्टी आल्याचे तिने म्हटले आहे. असित मोदींना 'लबाड माणूस' म्हणत मोनिका म्हणाली की, असित मोदी आणि सोहेल रमाणी सेटवर कलाकारांचा भरपूर अपमान करतात.
Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या...
अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘त्यांनी माझा एवढा छळ केला की, इथे काम करण्यापेक्षा आत्महत्या करणे मला अधिक चांगले आहे असे मला वाटू लागले होते. त्यांनी माझा प्रचंड मानसिक छळ केला. ते मला ओरडायचे आणि शिवीगाळ करायचे. सोहिल म्हणायचा की, आम्ही तुम्हाला पैसे देतो. मग आम्ही काहीही सांगू, ते तुला करावे लागेल.’
अभिनेत्रीने पुढे त्या दिवसांची घटना सांगितली, जेव्हा तिची दिवंगत आई कर्करोगावर उपचार घेत होती. आई रुग्णालयात असताना देखील निर्माते तिला सकाळी लवकर सेटवर येण्यास सांगायचे. तिला कोणत्याही कामाशिवाय सेटवर बोलावले जायचे. त्यावेळी तिचा कोणताही सीन देखील नसायचा. आईचे निधन झाल्यानंतरही असित मोदी यांनी तिला एकही फोन केला नाही, असा दावा तिने केला आहे. मोनिकाने पुढे आरोप केला की, निर्मात्याने तिचे करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. मोनिका म्हणाली, ‘असित कुमार मोदीने मला मुंबईत काम न करण्याची धमकी दिली होती. मी आधीच आई गमावल्याच्या मानसिक आघातातून जात होतो आणि इथे तो मला माझे करिअर बरबाद करण्याची धमकी देत होता. याचा माझ्या करिअरला मोठा फटका बसला. नंतर मला काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.’