Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघून तुमच्या डोळ्यांतही येईल पाणी! पहा Video
Mrs Chatterjee Vs Norwaytrailer:अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Mrs Chatterjee Vs Norway trailer:बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. राणी साकारत असलेल्या पात्राला नेहमीच मोठ्या पडद्यावर अक्षरशः जिवंत करते. एका मोठ्या ब्रेकनंतर राणी पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे,जो पाहिल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आहेत. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ ही कथा आहे एका आईची जी नॉर्वेमध्ये आपल्या मुलांसोबत आणि पतीसोबत राहते. पण, मग तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडते, की ती आपल्या मुलांसाठी संपूर्ण देशाविरुद्ध लढते.
ट्रेंडिंग न्यूज
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या ट्रेलरची सुरुवात मिसेस चॅटर्जी या व्यक्तिरेखेपासून होते. मिसेस चॅटर्जी ही कोलकाता सोडून तिच्या पती आणि मुलांसह नॉर्वेमध्ये स्थायिक झाली आहे. मिसेस चॅटर्जी आणि तिच्या कुटुंबाचे आयुष्य अतिशय आनंदाने आणि सुरळीत सुरू आहे. मात्र, एक दिवस असं काही घडतं की, त्यांचं सर्वकाही बदलून जातं. मिसेस चॅटर्जीची दोन्ही मुलं कायद्याचा हवाला देऊन तिच्याकडून हिसकावून घेतली जातात आणि ती चांगली आई नाही असं म्हटलं जातं. यानंतर मिसेस चटर्जींचा आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू होतो आणि ती संपूर्ण देशाविरुद्ध उभी ठाकते.
एक आई आपल्या मुलांसाठी सर्व मर्यादा ओलांडायला कशी तयार असते, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. यासोबतच,लहान मुलांना हाताने खायला घालणे,त्यांना आईवडिलांसोबत झोपवणे किंवा कपाळावर टिळा लावणे यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टीही ज्या आपल्या देशात अतिशय पवित्र आहेत, त्या परदेशात किती दुय्यम आहेत, हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.पण परदेशात याच गोष्टींकडे लक्ष वेधून मिसेस चॅटर्जींना चांगली आई नाही, असे लेबल लावले जाते.
‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट येत्या १७ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात राणी मुखर्जीसोबत जिम सरभ,नीना गुप्ता आणि अनिर्बन भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आशिमा छिब्बर यांनी दिग्दर्शित केला आहे.