Bharat Jadhav: पुन्हा रत्नागिरीत नाटक करणार नाही! भरत जाधव संतापले! नेमकं प्रकरण काय?
Bharat Jadhav On Ratnagiri Theatre : प्रेक्षकांना नेहमीच खळखळवून हरवणारे भरत जाधव आता संतापले आहे. त्यांनी रत्नागिरीत नाटकाचा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Bharat Jadhav On Ratnagiri Theatre : रंगभूमी असो वा मालिका किंवा चित्रपट, तीनही क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणून भरत जाधव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांना खळखळवून हसवले. मात्र, हेच भरत जाधव आता संतापले आहेत. ‘रत्नागिरीत पुन्हा नाटकाचा प्रयोग करणार नाही’, असा कठोर निर्णय त्यांनी घेतला आहे. अभिनेते भरत जाधव यांचा हा निर्णय ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामागे देखील एक मोठे कारण आहे.
सध्या भरत जाधव त्यांच्या ‘तू तू मी मी’ या नाटकातून रंगभूमी गाजवत आहेत. याच नाटकाचा एक प्रयोग नुकताच रत्नागिरीतील नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. मात्र, याच प्रयोग दरम्यान त्यांनी पुन्हा रत्नागिरीत नाटक न करण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृहांची झालेली दुरावस्था हेच यामागचं कारण आहे. अभिनेता भरत जाधव यांनी यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीतील या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टमवरून भरत जाधव नाराज झाले आहेत.
Tu Chal Pudha: मयुरी-प्रतीकच्या प्रेमाला अश्विनी देणार का होकार? ‘तू चाल पुढं’मध्ये नवा ट्वीस्ट!
भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना येथील साऊंड सिस्टम सतत बंद पडत होती. इतकंच नाही तर, या ठिकाणी असलेले एसी देखील नादुरुस्त झाले होते. प्रयोगात सतत येणार व्यत्यय तसेच, प्रेक्षकांची होणारी गैरसोय पाहून भरत जाधव संतापले आहेत. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल, तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही, असा प्रण भरत जाधव यांनी घेतला आहे.
‘एसी नसताना बंदिस्त नाट्यगृहात कशी अवस्था होते, हे कलाकाराच्या नजरेतून देखील पाहायला हवं. प्रचंड प्रकाशात काम करताना उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते. प्रेक्षकांना तर उकाड्यासोबतच डासांचा त्रासही होतोय. तरीही प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकतात?’ असा सवाल करत त्यांनी रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही असे म्हटले आहे. तर, यावेळी त्यांनी प्रेक्षकांची हात जोडून माफी देखील मागितली आहे. केवळ भरत जाधवच नाही तर, अनेक कलाकारांनी नाट्यगृहांच्या अवस्थेवर वेळोवेळी भाष्य केलं आहे. मात्र, प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल सगळेच करत आहेत.
विभाग