Amitabh-Jaya Bachchan 50th Anniversary: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. दोघांची लव्हस्टोरी आणि वैवाहिक आयुष्य नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. आज (३ जून) अमिताभ आणि जया त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात जया बच्चन यांची सर्वात खास खास जागा आहे. कारण, त्यांनी एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट देत असताना देखील अमिताभ बच्चन यांची साथ सोडली नव्हती. अमिताभ यांच्या कारकिर्दीची घसरण सुरू असताना जया मात्र हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री बनल्या होत्या.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट योगायोगानेच झाली होती. दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पुण्यातील एका फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले होते. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये फारसा संवाद झाला नाही. त्यानंतर एका मासिकाच्या मुखपृष्ठावर जया यांचा फोटो पाहून अमिताभ त्यांच्यावर भाळले होते. अनेक वर्षांनंतर, जया बच्चन यांना ‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा भेटताच जया बिग बींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्या. अमिताभ कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे, यामुळे त्या आणखीनच प्रभावित झाल्या.
‘गुड्डी’नंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना ‘एक नजर’ चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा भेटण्याची संधी मिळाली. ‘एक नजर’च्या सेटवर अमिताभ यांना जया बच्चन आवडू लागल्या. जया आणि अमिताभ यांच्या भेटींचा हा सिलसिला वाढतच गेला. यादरम्यान जया एक यशस्वी अभिनेत्री बनल्या होत्या, तर अमिताभ यांचा संघर्ष अधिक लांबला होता. जया आणि अमिताभ यांच्या प्रेमकथेत ‘जंजीर’ हा चित्रपट खूप खास आहे. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे कोणत्याही अभिनेत्रीला बिग बींसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यावेळी जया अमिताभसोबत ‘जंजीर’मध्ये काम करण्यास तयार झाल्या. ‘जंजीर’ हा बिग बींच्या करिअरमधला असा चित्रपट होता की, ज्याने त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. अमिताभ यांनी ठरवले होते की, जर हा चित्रपट इतर चित्रपटांप्रमाणेच फ्लॉप झाला, तर ते चित्रपटसृष्टी कायमची सोडून अलाहाबाद येथील त्यांच्या घरी परततील.
‘जंजीर’चे शूटिंग सुरू असताना त्यांच्या मित्रांनी एक पैज लावली की, जर हा चित्रपट हिट झाला तर ते सेलिब्रेशन करण्यासाठी लंडनच्या ट्रिपला जातील. ‘जंजीर’ ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. यासोबतच अमिताभ बच्चन बॉलिवूडचे नवे स्टार बनले. ‘जंजीर’ हिट झाल्यानंतर आता त्यांना लंडनला जावे लागणार होते. अमिताभ यांनी लंडनला जात असल्याचे घरी सांगताच, वडील हरिवंशराय बच्चन यांनी विचारले की, सोबत कोण जात आहे. बिग बींनी त्यांच्या मित्रांसोबत जयाच्या नावाचा उल्लेख करताच त्यांच्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला.
त्यांच्या वडिलांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तू मुलीसोबत लंडनला जाऊ शकत नाहीस आणि जायचे असेल तर आधी लग्न कर. अशा परिस्थितीत बिग बींनी लगेचच जया बच्चन यांना लग्नासाठी प्रपोज केले आणि दोघांनी ३ जून १९७३ रोजी घरातील सदस्यांच्या उपस्थित साधेपणाने लग्न केले.
संबंधित बातम्या