Marathi News 21 September Live : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
Sep 21, 2022, 02:21 PMIST
Marathi News Live Updates: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. गेले ४२ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.
रामदास कदम यांनी केलेल्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात फोटोला जोडे मारो आंदोलन
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल विधानाच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील स्वारगेट चौकात शिवसेना पुणे शहर यांच्यातर्फे रामदास कदमांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील करण्यात आली.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
Share Market: शेअर बाजारानं सकाळच्या सत्रात फडकवलं लाल निशाण
सुरुवातीच्या दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सकाळी शेअर बाजारानं लाल निशाण फडकवलं आहे. अर्थात, पुन्हा बाजार सावरतानाही दिसत आहे. सध्या सेन्सेक्स ७० अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टी ३७ अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्र्यांचा आठवा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांचा आजचा हा आठवा दिल्ली दौरा असेल. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे आतापर्यन्त सातवेळा दिल्लीला जाऊन आले आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीत दाखल होणार आहे.
Baramati : अर्थमंत्री निर्मला सितारमण आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर
Nirmala Sitaraman Baramati Visit : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचं पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष असल्याचं दिसून येत आहे. कारण अर्थमंत्री निर्मला सितारमण या आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. याशिवाय पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक घेऊन आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी करणार असल्याची माहिती आहे.
Road Accident : दिल्लीत भरधाव टेम्पोनं पाच लोकांना चिरडलं; चौघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
Road Accident In Simapuri Delhi : राजधानी दिल्लीतील सिमापूरी भागात एका भरधाव टेम्पोनं पाच लोकांना उडवल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात चार लोकांचा जागीच मृत्यू झाला असून एकाला गंभीर मार लागला आहे. मध्यरात्री झालेल्या या अपघातामुळं दिल्लीत खळबळ उडाली आहे.
Shinde-Fadnavis Govt : टाळेबंदीत आंदोलकांवर लागलेले गुन्हे मागे; सरकारची मोठी घोषणा
Shinde-Fadnavis Govt : कोरोना महामारीमुळं राज्यात लागलेल्या टाळेबंदीच्या काळात अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटनांनी आंदोलनं केली होती. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. परंतु आता हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. जे राजकीय आंदोलन असतील किंवा ज्या केसेसमध्ये पाच लाखांहून कमी नुकसान झालेलं असेल तेच गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.
Maharashtra Rain : मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट, मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Prakash Ambedkar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या डाव रचला: प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीने उचलला होता, असा आरोपी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर (Shiv Sena) आघाडी करायला तयार होतो. मात्र, आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून प्रतिसाद नाही असेही ते म्हणाले.
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. हा सामना सेंट लॉरेन्स ग्राऊंड, येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५.३० ला हा सामना सुरु होईल. पहिला सामना भारतीय महिलांनी जिंकल्यामुळे आजचा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
मुंबई सत्र न्यायालयात प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टापुढे हजर करणार आहेत.
Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
दसरा मेळाव्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांपुढं ठेवून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.