Marathi News 21 November 2022 Live: महालक्ष्मी रेस कोर्स जवळ झाडाची फांदी कारवर पडून एक जण ठार
Nov 21, 2022, 09:48 PMIST
Marathi News Live Updates : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे. सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला असून निफ्टी देखील जवळपास १५० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.
झाडाची फांदी कारवर पडून एक जण ठार
राखंगी चौक, महालक्ष्मी रेस कोर्स जवळ, महालक्ष्मी येथे पोकलेन झाडावर आदळल्याने झाडाची फांदी कारवर पडून एकजण ठार झाल्याची घटना घटली. तसेच एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सयोग मनोहर पवार ( ३८ वर्ष रा. ठाणे, वाघाळे इस्टेट) असे या अपघातात मृताचे नाव आहे. ही घटना दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास . घडली.
Stock Market: शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे. सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला असून निफ्टी देखील जवळपास १५० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.
Morbi Bridge : मोरबीतील पूल दुर्घटनेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; गुजरात सरकारच्या अडचणी वाढणार?
Morbi Bridge Accident : काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेत तब्बल १३७ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळं आता कोर्ट यावर काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Eknath Shinde : पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची होणार चौकशी; मुख्यमंत्र्यांचे आदेश
Navale Flyover Accident : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या विचित्र अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल दुपारी भरधाव टॅंकरनं तब्बल ४८ गाड्यांना उडवलं होतं. या घटनेत दहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळं आता या अपघातामागं नेमकं काय कारण होतं, याची सखोल चौकशी केली जाणार आहे.
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांची नोटीस
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अरबी समुद्रात होणारं जलसमाधी आंदोलन थांबवा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा नोटीसीमधून दिला आहे. सोयाबीन आणि कापसाच्या दरप्रश्नी रविकांत तुपकर यांनी अरबी समुद्रात जलसमाधी घेईन असा इशारा सरकारला दिला होता.
बिहारमध्ये ट्रकने चिरडल्याने १२ जणांचा मृत्यू
बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने चिरडल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री महनार हाजीपूर हायवेवर हा अपघात झाला. या अपघातानंतर जमावाने रागाच्या भरात ट्रक चालकाला बेदम मारहाणही केली. अपघातानंतर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.