Marathi News 20 August 2022 Live: जखमी गोविंदांची विचारपूस करण्यासाठी आशिष शेलार केईएम रुग्णालयात
Aug 20, 2022, 04:34 PMIST
Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.
Baliram Siraskar: माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा भाजपमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का
अकोल्यात भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. येथील माजी आमदार बळीराम सिरस्कार यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
Ashish Shelar: आशिष शेलार यांनी केली जखमी गोविंदांची विचारपूस
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी प्रवीण बांगर यांच्यासह गोविंदांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली. केईएम रुग्णालयात सहा जणांवर उपचार सुरू आहेत, तर एकाला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
सिसोदियांनी नाव Money Shh असं केलंय : अनुराग ठाकूर
मनीष सिसोदिया यांनी नावाचं स्पेलिंगसुद्धा बदललं आहे. आता Money Shh असं केलंय. कमवा आणि गप्प बसा. हेच आहे घोटाळे करा आणि पळून जा. महिला सशक्तीकरण दूरच पण महिलांचा अपमान कसा केला जातो हे आम आदमी पक्षाकडे पाहून दिसतं असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.
barti: डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी अनुसूचित जातीतील महाराष्ट्रातील रहिवासी असावा. एमफिल, पीएचडीसाठी १ जून २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कायमस्वरुपी नोंदणी असावी. विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०२१ साठी २५ ऑगस्ट रोजी https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह भरलेल्या अर्जाची प्रत बार्टी, २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावी किंवा प्रत्यक्ष येऊन सादर करावी.
देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला बाजूला काढलं - आशिष शेलार
भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आशिष शेलार यांनी महाभारात बदलतंय असं म्हटलं. ते म्हणाले की, भारत नवभारत होतो, थोडं महाभारत बदलतंय असं वाटतंय. कौरव पांडवातलं युद्ध अटळ होतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण कर्णाला सांगायला गेले होते की, युद्ध अटळ आहे बाजूला हो. तु या युद्दाचा भाग होऊ नको, कारण अधर्म आणि धर्म यामध्ये युद्ध आहे. कर्णाने भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं नाही. युद्ध अटळ होतं, कौरव पराजित झाले, कर्णाचा वध झाला. पण आजचं महाभारत वेगळंय, देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला युद्धातून बाजूला काढलंय. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील या लढाईत आणि कृष्णही आमच्यासोबत आहे आणि कर्णही आमच्यासोबत आहे. महापालिकेत भाजपचा महापौर आता कोणी थांबवू शकत नाही. मुंबईत मुंबईकरांचे राज्य येण्यापासून कोणी रोखू शकत नाही."
Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांवर होणाऱ्या टीकेवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपसोबत निवडणूक लढून आम्ही मुंबई महापालिका जिंकणार, असा दावा केसरकर यांनी केला आहे.
Rahul Gandhi: वडिलांच्या जयंतीदिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं खास ट्वीट
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. या निमित्तानं त्यांचे चिरंजीव तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खास ट्वीट केलं आहे. ‘तुम्ही प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आणि मला हृदयस्थ आहात. देशाच्या भविष्यासाठी तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करेन,’ असं राहुल यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Govinda Job Reservation: खेळाडूंना आधीपासून असलेल्या आरक्षणातूनच गोविंदांना नोकरी दिली जाणार, कुठलंही नवं आरक्षण नाही - चंद्रकांत पाटील
खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाचा नियम पूर्वीपासून आहे. त्याच्यातूनच गोविंदांना आरक्षण दिलं जाणार आहे. अतिरिक्त नाही. त्यामुळं अजित पवार यांनी आरडाओरड करू नये, असं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Jalgaon: जळगावात आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडले
शिवसेनेतील बंडाळीनंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली असून त्या निमित्तानं ते आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी ठिकठिकाणी फलक लावले आहेत. त्यापैकी गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील बॅनर अज्ञातांनी फाडल्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.
Delhi Congress: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडताच काँग्रेस आक्रमक झाली आहे. सिसोदिया यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसनं आज निदर्शनं केली.
Mumbai Under Terror Threat : मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करू; अतिरेक्यांची मुंबई पोलिसांना धमकी!
Mumbai Police Threatened : २६ नोव्हेंबर २००८ साली ज्या प्रकारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता, त्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूम मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. एका पाकिस्तानी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Harihareshwar Boat News : हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटीचा तपास एटीएसकडे!
Harihareshwar Boat News In Marathi : दोन दिवसांपूर्वी हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर शस्त्रांसह सापडलेल्या संशयास्पद बोटींमुळं राज्यात खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास तटरक्षक दल आणि पोलिसांनी केला होता. परंतु आता या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथककडे सोपवण्यात आला आहे.
CM एकनाथ शिंदे भीमाशंकरला आज देणार भेट
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुयातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देणार आहे. त्यांचा ठाणे येथील निवस्थानातून ते मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने चाकण तळेगाव येथून भीमाशंकर येथे जाणार आहे. संध्याकाळी ४.३० ला भीमाशंकर येथे पोहचणार आहेत. त्या नंतर पुन्हा ते माघारी ठाणे येथे जाणार आहेत.
Pune cat rescue : लालमहाल येथे जाळित अडकलेल्या मांजराला जीवदान
पुणे : पुण्यात लालमहाल याठिकाणी शनिवारी सकाळी दुसऱ्या मजल्यावर लाकडाच्या जाळीमधे मांजर अडकले होते. जवानांनी Hexablade चा वापर करूत जाळी कापत मांजराची पाच मिनिटात सुखरुप सुटका केली. यामधे कसबा केंद्र प्रभारी अग्निशमन अधिकारी कमलेश चौधरी, डचालक संदीप थोरात व जवान सुरेश पवार, संतोष अरगडे, प्रदीप पेडणेकर यांनी सहभाग घेतला.
Govinda Death In Dapoli : दहीहंडीत नाचताना गोविंदाचा मृत्यू; दापोलीतील धक्कादायक घटना!
Govinda Death In Dapoli Ratnagiri : रत्नागिरीतील दापोलीमध्ये साजरा दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडलं आहे. कारण दहीहंडी उत्सवात नाचताना असताना वसंत लाया चौगले (५५) यांचा मृत्यू झाला आहे. दहीहंडीत नाचत असताना ते अचानक चक्कर येऊन खाली पडले आणि हृदयविकाराच्या झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Corona Update India: देशात २४ तासात कोरोनाचे १३,२७२ नवे रुग्ण
गेल्या २४ तासात भारतात कोरोनाचे १३ हजार २७२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १३ हजार ९०० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या १ लाख १ हजार १६६ जण कोरोनावर उपचार घेत असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ४.२१ टक्के इतका आहे.
पुण्यात हल्ला झाला तिथेच एकटा सभा घेणार : मंत्री उदय सामंत
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस मंत्री उदय सामंत हे दोन आठवड्यापूर्वी एका कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. आता जिथे हल्ला झाला तिथेच येत्या १५ दिवसात एकटा जाऊन सभा घेणार असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. रत्नागिरीत दहीहंडी स्पर्धेवेळी ते बोल होते.
Rajiv Gandhi Birth Anniversary: पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींना वाहिली आदरांजली
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज जंयती आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून राजीव गांधींना आदरांजली वाहिलीय. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलंय.
Sinhgad Road Crime News : पुण्यात दहीहंडीला गालबोट; सिंहगड रोडवर गोळीबार
Sinhgad Road Crime News : राज्यभरात काल संध्याकाळी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. परंतु पुणे शहरात या उत्सवाला गालबोट लागलं आहे. कारण मोक्का लागलेल्या एका आरोपीनं सिंहगड रोडवर हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
Uttarakhand : उत्तराखंडमध्ये तामसा नदीला अचानक पूर, तापकेश्वर मंदिर पाण्याखाली
शुक्रवारी उत्तराखंडमध्ये मुसळाधर पाऊस झाल्याने डेहराडूनमधील तापकेश्वर मंदिराजवळ तामसा नदीला अचानक पूर आला आहे. नदीच्या पाण्याचा वेग वाढला होता. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही.
Rajsthan Accident: राजस्थानमध्ये भीषण अपघात, ६ भाविकांचा मृत्यू
राजस्थानमधील पाली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये ६ जणांचा मृ्त्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमधून सर्व भाविक रामदेवराहून पालीला परत येत होते.