Marathi News 19 August 2022 Live: दहीहंडीच्या उत्साहावर विरजण, रत्नागिरीत नाचताना गोविंदाचा मृत्यू
Aug 19, 2022, 09:42 PMIST
Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.
दहीहंडीच्या उत्साहावर विरजण, रत्नागिरीत नाचत असताना गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीच्या उत्साहावर विरजण, रत्नागिरीत नाचत असताना गोविंदाचा मृत्यू
रत्नागिरी जिह्यातील पाज पंढरी गावात एका गोविंदाचा दहीहंडीच्या कार्यक्रमात निधन झाले आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात नाचत असताना या गोविंदाला अचानक हृदयविकराचा झटका आला. हा झटका इतका जोरदार होता की, कुणाला समजण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दहीहंडीच्या उत्साहावर विरजण पडले असून गावावर शोककळा पसरली आहे. वसंत लाया चौगले, असे मृत्यू झालेल्या गोविंदाचे नाव आहे.
वरळीत गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला
दहीहंडीचा उत्साह आहे. पण या उत्साहादरम्यान काही अनपेक्षित घटना समोर येत आहे. मुंबईच्या वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित भाजपच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एक दुर्घटना घडली आहे. एक गोविंदा थेट सहाव्या थरावरुन कोसळला आहे. या दुर्घटनेत संबंधित गोविंदा हा जागेवरच बेशुद्ध झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला बेशुद्ध अवस्थेतच केईएम रुग्णालयात नेण्यात आलंय.
pune news : आधार क्रमांक मतदार यादीतील नावाशी जोडण्याचे आवाहन
पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक संलग्न करण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. निवडणूक आयोगाचे nvsp.in हे पोर्टल, वोटर हेल्पलाईन किंवा गरुड ॲपद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी कळविले आहे.
Bhagatsingh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मंदिर व्यवस्थापन समितीकडून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व ट्रस्टींच्या हस्ते राज्यपालांना देवीचा फोटो, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. राज्यपालांनी योगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन पूजा आरती केली.
pune rain update : खडकवासला धरणातून ६ हजार ८४८ क्युसेकने विसर्ग सुरू
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ४ हजार ७०८ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी ३ वाजता ६ हजार ८४८ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी अशी माहिती सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी दिली.
Pune Rain update वरसगाव धरणातून विसर्ग वाढवला
वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा २ हजार ३४६ क्यूसेक विसर्ग वाढवून दुपारी २ वाजता ३ हजार ५५२ क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे ५७० क्यूसेक्स म्हणजे एकूण ४ हजार १२२ क्यूसेक करण्यात येत आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी माहिती सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी दिली.
Pune News: तृतीयपंथीयांसाठी सामाजिक सुरक्षा व कायदेविषयक चर्चासत्र संपन्न
पुणे : तृतीयपंथीय समुहातील घटकांसाठी सामाजिक सुरक्षा, आरोग्य, कल्याण, व्यवसाय प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी व कायदेविषयक हक्क व अधिकार याबाबत जनजागृती व्हावी यासाठी समाज कल्याण विभाग व सेंटर फॉर अॅडव्होकसी अॅण्ड रिसर्च संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित चर्चासत्रात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखरे, पुणे महापालिकेचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अॅड. पल्लवी बाधणे आदी उपस्थित होते.
Eknath Shinde: दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली - एकनाथ शिंदे
दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केली.
Eknath Shinde: ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती
ठाण्यातील टेंभी नाक्यावर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. अभिनेत्री श्रद्धा कपूर ही देखील यावेळी उपस्थित होती. श्रद्धा कपूरनं यावेळी उपस्थितांच्या समोर मराठी भाषेत संवाद साधला.
Borivali Building Collapse: बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली
मुंबई - बोरीवलीत चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. बोरीवली पश्चिम इथं साईबाबा नगरात इमारत कोसळल्याची माहिती समजते.
मुंबईत १२ गोविंदा जखमी, ७ जणांवर उपचार सुरू
सध्या सगळीकडे दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईत सकाळपासून दहीहंडीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १२ गोविंदा जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलाय. तर ७ जणांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं.
Dahi Handi: मागाठणे येथील दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
भाजपा मागाठाणे विधानसभा आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं दहिसरमधील अशोकवन इथं आयोजित दहीहंडी उत्सवास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर व मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारांचीही यावेळी उपस्थिती असेल.
Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी
एनसीबीचे माजी मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांनी या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Coronavirus: देशात मागील २४ तासांत १५,७५४ नव्या करोना रुग्णांची नोंद
देशभरात मागील २४ तासांत १५,७५४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून १५,२२० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १ लाख १ हजार ८३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन संसर्गाचा दर ३.४७ टक्के आहे.
Share Market: शेअर बाजारात चढउतार कायम
शेअर बाजारात चढउतार सुरूच आहेत. बाजार खुला झाला तेव्हा किंचित वधारलेला सेन्सेक्स पुन्हा घसरला आहे. निफ्टीनंही लाल निशाण फडकवलं आहे.
लँडिंगवेळी दोन विमानांची धडक, अपघातात दोघांचा मृत्यू
कॅलिफोर्नियात दोन लहान विमानांची धडक झाल्यानं अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून अद्याप नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही. विमान लँडिंगच्या आधी हा वॅटसोनविले शहरात स्थानिक विमानतळावर ही घटना घडली आहे.
Janmashtami: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती आणि उत्साहाचा हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येऊदे असं मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे.
Raigad : शस्रासह सापडलेल्या बोटीच्या ठिकाणी कडक सुरक्षा बंदोबस्त
रायगडमध्ये संशयास्पद बोटीवर एके ४७ रायफल्स आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता जिथे ही शस्रास्त्रे सापडली तिथे सुरक्षा दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राज्यातील सत्तापेचावर सुनावणीची तारीख ठरली
महाराष्ट्रातील संत्तासंघर्षाच्या पेचावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने याआधी २ वेळा पुढे ढकलली होती. आता २२ ऑगस्टरोजी सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. आता यामध्ये प्रकरणाचा निकाल लागणार की मोठ्या पीठाकडे सोपवले जाणार हे महत्त्वाचं ठरेल.