Ranji Trophy: मध्य प्रदेश चॅम्पियन! मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरमध्ये जल्लोष
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात ५३६ धावांची मोठी मजल मारली होती.
मध्य प्रदेशने रणजी ट्रॉफी २०२१-२२ चे फायनल जिंकून इतिहास रचला आहे. एमपीने ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबईला पराभूत करून प्रथमच विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबईने मध्य प्रदेशसमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य होते. ते मध्य प्रदेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेश कडून सलामीवीर हिमांशू मंत्री ३७, शुमभ शर्मा ३० तर रजत पाटीदारने ३० धावा केल्या.
मध्य प्रदेशच्या या ऐतहासिक विजयानंतर संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखिल या सामन्यावर लक्ष ठेवून होते. मध्य प्रदेशच्या संघाने विजय मिळवताच मुख्यमंत्री चौहान यांनी हेलिकॉप्टरमध्येच जल्लोष करायला सुरुवात केली. याचा व्हिडीओही मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे.
सोबतच, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, "रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपल्या अप्रतिम आणि अनोख्या खेळाने मध्य प्रदेशच्या संघाने शानदार विजय तर मिळवलाच पण लोकांची मनेही जिंकली.
या अभूतपूर्व विजयाबद्दल मध्य प्रदेश संघाचे हार्दिक अभिनंदन. तुमची विजयी घोडदौड अखंडपणे सुरू राहो, शुभेच्छा!"
१०८ धावांचे आव्हान सहज गाठले-
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात ५३६ धावांची मोठी मजल मारली. मध्य प्रदेशकडून यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शानदार शतके झळकावली. तर मुंबईकडून सर्फराज खानने पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. तसेच, मुंबईला दुसऱ्या डावात केवळ २६९ धावाच करता आल्या. कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत दुसऱ्या डावात मुंबईचे कंबरडे मोडले. त्यानंतर मिळालेले १०८ धावांचे आव्हान एमपीने शेवटच्या दिवशी सहज पूर्ण केले.