GT vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या दारुण पराभवाचं कारण काय?, संतापलेल्या रोहित शर्माने सगळंच सांगितलं
GT vs MI IPL 2023 : गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा पराभव झाल्यामुळं रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली आहे.
Rohit Sharma On GT vs MI IPL Match 2023 : गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा तब्बल ५५ धावांनी दारुण पराभव झाला आहे. रोहित शर्मा, इशान किशन, टीम डेव्हिड, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळं मुंबईला यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर आता गुजरातविरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव का झाला, याचं कारण कर्णधार रोहित शर्माने सांगितलं आहे. शेवटच्या सात षटकांत मुंबईकडे विस्फोटक खेळी करणारे फलंदाज न उरल्यामुळंच आम्हाला गुजरातविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्याचं सांगत रोहित शर्माने संघातील फलंदाजांना चांगलंच फटकारलं आहे.
गुजरातविरुद्धचा सामना संपल्यानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, गुजरातच्या इंनिंगवर आमचं नियंत्रण होतं, परंतु अखेरच्या षटकांत आमच्या गोलंदाजांनी अधिकच्या धावा दिल्या. आमच्याकडे चांगली खेळी करणारे फलंदाज असून धावांचा पाठलाग करण्यात आम्ही स्वत:ला सिद्ध केलेलं आहे, परंतु दिवस आमचा नव्हता. अखेरच्या सात षटकांमध्ये विस्फोटक खेळी करणारे फलंदाज शिल्लक न राहिल्यामुळंच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, असं म्हणत रोहित शर्माने मुंबईच्या पराभवाचं खापर खराब फलंदाजीवर फोडलं आहे.
GT vs MI IPL 2023 : गुजरातच्या वादळासमोर मुंबई इंडियन्स भूईसपाट, नूर-राशिद ठरले जायंट किलर
मागच्या सामन्यात आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळं आम्ही दोनशेपार धावा केल्या होत्या. परंतु थोडक्यात आमचा पराभव झाला. गुजरातविरुद्धच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी शेवटच्या चार षटकांत ७० धावा दिल्या. त्यामुळं आमच्यासाठी सामना कठीण झाला होता, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे. शुभमन गिल, अभिषेक मनोहर, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतियाच्या विस्फोटक खेळीमुळं गुजरातने मुंबईला तब्बल २०८ धावांचं लक्ष्य दिलं होतं. परंतु मुंबईचे पाच फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने अखेरच्या षटकांत फलंदाजच शिल्लक न राहिल्यामुळंच संघाचा पराभव झाल्याचं मुंबईच्या कर्णधाराने म्हटलं आहे.