संजू-सुर्या प्लेईंग ११ मध्ये फिक्स, ओपनिंगसाठी पुण्याच्या २ खेळाडूंमध्ये चुरस
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या बळावरच भारतीय खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंवर चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव असेल.
भारत आणि आयर्लंड (india vs ireland) यांच्यातील दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया डब्लिनला पोहोचली आहे. दोन्ही सामने डब्लिनच्या कॅसल एव्हेन्यू स्टेडियमवर खेळवले जातील. हार्दिक पांड्या पहिल्यांदाच टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना या दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे खेळणार नाहीत. सोबतच रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे खेळाडू देखील आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. कारण हे सर्वजण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त आहेत.
पंत आणि श्रेयसच्या जागी राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक लक्ष्मणसह संघ व्यवस्थापनासमोर प्लेइंग-११ निवडण्याबाबत आव्हान असणार आहे. पंतच्या जागी संजू सॅमसन आणि श्रेयसच्या जागी सूर्यकुमार यादवचे स्थान संघात जवळपास निश्चित मानले जात आहे.
मनगटाच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार संघात पुनरागमन करत आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळू शकला नव्हता. सॅमसनच्या ऐवजी दीपक हुड्डाचाही विचार होऊ शकतो. कारण हुड्डा फिरकी गोलंदाजीही करू शकतो.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋतुराज गायकवाडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पाच सामन्यांच्या पाच डावांत त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले. ऋतुराजच्या जागी राहुल त्रिपाठीला अंतिमा ११ मध्ये स्थान मिळू शकते. ऋतुराज आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पुण्याचे आहेत. त्रिपाठी इशान किशनसोबत सलामीला येऊ शकतो. सूर्यकुमार सोबतच सॅमसन, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
या सोबतच, गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे प्लेइंग-११ मधील स्थान अद्याप निश्चित मानले जात नाही. संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक लक्ष्मण पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल यांच्यावर विश्वास ठेवू शकतात. त्याचबरोबर फिरकीची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यावर असेल. या मालिकेतील कामगिरीच्या बळावरच भारतीय खेळाडूंची इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी निवड होणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंवर चांगले प्रदर्शन करण्याचा दबाव असेल.
भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आवेश खान, हर्षल पटेल, उमरान मलिक , अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई.