Kohli Gambhir Fight : विराट-गंभीरच्या वादात हरभजनची उडी, श्रीशांतशी झालेल्या राड्याचा दाखला देत म्हणाला...
Virat Kohli vs Gautam Gambhir : आरसीबी आणि लखनौतील सामना संपल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली होती.
Harbhajan Singh On Virat Kohli Gambhir Fight : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या आरसीबी आणि लखनौतील सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. याशिवाय लखनौचा गोलंदाज नवीन उल-हक आणि कोहली यांच्यातही वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आयपीएलमधील या राड्यावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंगने उडी घेतली आहे. याशिवाय श्रीशांतशी झालेल्या वादाचा दाखला देत हरभजनने दोन्ही खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळं आता हरभजनने घेतलेल्या भूमिकेचं अनेकांनी स्वागत करत त्याचं कौतुक केलं आहे.
लखनौ आणि आरसीबीच्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वादावादीनंतर हरभजनसिंगने एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्याने मैदानावर घडलेला प्रकार चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओत बोलताना हरभजन म्हणाला की, हस्तांदोलन करताना विराटचा हात कुणीतरी झटकला, हा प्रकार कुणी केला, ते व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. विराट, गंभीर आणि नवीन उल-हक यांच्यात नेमकं काय झालं हे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु हे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मैदानावर खेळाडूंचं असं वागणं योग्य नाहीये. मी श्रीशांतच्या कानाखाली मारली होती, त्याचा मला आजही पश्चाताप होत असल्याचं म्हणत हरभजन सिंगने विराट आणि गंभीरला वाद मिटवून घेण्याचा सल्ला दिला आहे.
विराट कोहली हा महान फलंदाज आहे. त्याने कुणाशीही वाद घालणं योग्य नाहीये. तो सामन्यात खेळत असल्यामुळं त्याचं उत्साही होणं साहजिक आहे, परंतु वाद घालणं योग्य नाही. विराट आणि गंभीर हे माझे भाऊ आहेत, वाद घालून किंवा भांडणं करून काहीही साध्य होणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू शकतो. असं म्हणत हरभजन सिंगने विराट आणि गंभीरला खडसावलं आहे.