CWG 2022: आतापर्यंत १२ लाख तिकिटांची विक्री, IND vs PAK सामन्याला सर्वाधिक मागणी
क्रिकेटचा पहिला सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.तर ७ ऑगस्ट रोजी क्रिकेटमधील सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने खेळवले जातील.
भारत आणि पाकिस्तान हे कोणत्याही खेळात आमने सामने आले तरी दोन्ही देशांच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचते. आता हे दोन्ही संघ राष्ट्रकुल स्पर्धेत आमने-सामने येणार आहेत, या लढतीचीही चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
विशेष म्हणजे, या वर्षी प्रथमच महिला क्रिकेटला राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान देण्यात आले आहे. या वेळी बर्मिंगहॅममध्ये २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. तर ३१ जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानचे महिला क्रिकेट संघ भिडणार आहेत.
एजबॅस्टनमध्ये होणारा हा सामना प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये होऊ शकतो. अशी आशा मॅनेजमेंटने व्यक्त केली आहे. कारण आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेची एकूण १२ लाख तिकिटे विकली गेली आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची बहुतांश तिकिटेही विकली गेली आहेत. सामन्याला अजून आठवडाभराहून अधिक कालावधी बाकी आहे. अशा स्थितीत हा सामना हाऊसफुल्ल होऊ शकतो, असे मॅनेजमेंटचे मत आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सचे सीईओ इयान रीड म्हणाले की, ‘मी देखील क्रिकेटचा मोठा चाहता आहे. तसेच, अंतिम आणि उपांत्य फेरीच्या तिकीटांची आतापर्यंत विक्री झाली आहे. तर भारत-पाकिस्तान सामनाही हाऊसफुल्ल होण्याची शक्यता आहे. भारतीय पुरुष संघ नुकताच बर्मिंगहॅम येथे कसोटी सामना खेळून गेला आहे. तर आता तिथे महिला संघ खेळणार आहे. अशा स्थितीत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे'.
दरम्यान, या स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.तर ७ ऑगस्ट रोजी क्रिकेटमधील सुवर्ण आणि कांस्य पदकांचे सामने खेळवले जातील. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे.