Chennai Accident : कोट्यवधींची रोकड नेणाऱ्या वाहनाला अपघात, पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला
Chennai Accident News : तब्बल पाचशे कोटींची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
Chennai Tamilnadu Accident News : आरबीआयची तब्बल ५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नईतील विल्लुपुरमलाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असून पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला आहे. त्यामुळं चेन्नईत खळबळ उडाली असून मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळं पाचशे कोटी रुपयांची कॅश घेऊन जाणारं वाहन रस्त्यात अडकून पडल्यामुळं लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ट्रकला दुसऱ्या वाहनाच्या मदतीने खेचून आरबीआयच्या कार्यालयात नेण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयची तब्बल ५३५ कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता, त्यावेळी ट्रकचालक आणि सुरक्षारक्षकांना काहीच समजेना. त्याच मार्गावरून जात असलेल्या पोलिसांनी ट्रकचालकाला हटकलं. त्यावेळी चालकाने ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं. तसेच वाहनात आरबीआयची कोट्यवधींची रोकड असल्याचंही चालकाने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी कडेकोट सुरक्षेत बंद पडलेल्या ट्रकला आरबीआयच्या कार्यालयात सुरक्षित पोहचवलं आहे. त्यामुळं या घटनेची तामिळनाडूसह देशभरात चर्चा होत आहे.
वाहन अचानक बंद पडल्याने त्यातून धूर निघायला लागला, त्यावेळी कोट्यवधींच्या नोटांना आग लागली तर नाही ना?, असा संशय चालकाला आला होता. त्यावेळी त्यांनी खाली उतरून पाहिलं असता इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यावेळी कोट्यवधींची रोकड घेऊन जाणाऱ्या ट्रक नादुरुस्त झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने अनेक लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्याचवेळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.