Supreme Court : केरला स्टोरीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली, सरन्यायाधीशांनी बंगाल सरकारला फटकारलं
Supreme Court : पश्चिम बंगाल सरकारने केरला स्टोरी या चित्रपटावर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.
Supreme Court On The Kerala Story : सुदिप्तो सेन दिग्दर्शित केरला स्टोरी हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील सरकारांनी केरला स्टोरीच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालमधील केरला स्टोरीवरील बंदी उठवत बंगाल सरकारला चांगलंच फटकारलं आहे. असहिष्णुतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर केला जाऊ शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने बंगाल सरकारला फटकारलं आहे. कोर्टाने बंदी उठवल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील चित्रपटगृहांत केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये अद्याप केरला स्टोरीवर बंदी कायम आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणाले की, केरला स्टोरी चित्रपट हा सगळीकडे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. मग काही राज्यांमध्ये त्यावर बंदी कशासाठी?, एखाद्या जिल्ह्यात समस्या असतील तर संपूर्ण राज्यात बंदी का?, सार्वजनिक असहिष्णुतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर केला तर सर्वच चित्रपटांवर सुप्रीम कोर्टात सुनावण्या घ्याव्या लागतील. कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम हे बंगाल सरकारचं आहे, असं म्हणत सरन्यायाधीशांनी त्यामुळं केरला स्टोरीवर घालण्यात आलेल्या बंदी उठवली आहे.
केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत बंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत केरला स्टोरीवरील पश्चिम बंगालमधील बंदी उठवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. उर्वरित याचिकांवर जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.