मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SC on Maharashtra political crisis Live : एकनाथ शिंदे सरकार तूर्त वाचलं! मात्र टांगती तलवार कायम

SC on Maharashtra political crisis Live : एकनाथ शिंदे सरकार तूर्त वाचलं! मात्र टांगती तलवार कायम

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 11, 2023 12:30 PM IST

Supreme Court Decision On Shiv Sena Today : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट सकाळी साडेअकरा वाजता निकाल देणार आहे.

supreme court hearing on shiv sena crisis
supreme court hearing on shiv sena crisis (HT)

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis Today Live : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या प्रकरणात निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण, शिवसेनेवरील वर्चस्व तसेच राज्यपालांची सत्ताबदलावेळची भूमिका या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात आज भाष्य होणार आहे.

 

  • बहुमत चाचणी बोलावून राज्यपालांनी राजकीय भूमिका घेतली- सरन्यायाधीश
  • उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही पूर्वस्थिती निर्माण करण्याचे आदेश दिले असते- सरन्यायाधीश
  • उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणता आला असता परंतु एका पत्राच्या आधारावर बहुमत चाचणी बोलावणं चुकीचं- सरन्यायाधीश
  • शिवसेनेतील बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पाठिंबा काढायचा होता, हे राज्यपालांना मिळालेल्या पत्रात कुठेही नव्हतं- सरन्यायाधीश
  • बहुमत चाचणीसाठी आमदारांच्या अपात्रतेचं कारण योग्य नव्हतं- सरन्यायाधीश
  • राज्यपालांनी अधिकार नसताना बहुमत चाचणीचे आदेश दिले, सरन्यायाधीशांकडून राज्यपालांच्या निर्णयांवर ताशेरे
  • अपात्रतेच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी 'आम्ही खरी शिवसेना' असा बचाव केला जाऊ शकत नाही, कुठल्याही पक्षातील अंतर्गत गट थेट पक्षावर दावा करू शकत नाही.
  • राज्यपाल (भगतसिंह कोश्यारी) यांनी दिलेले बहुमत चाचणीचे आदेश बेकायदेशीर- सरन्यायाधीश चंद्रचूड
  • निकालाचं वाचन करताना सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणाले की, विधी मंडळाच्या सभागृहातील प्रत्येक बाब आमच्या अधिकारांच्या कक्षेत येत नाही, राज्यघटनेच्या १० व्या सूचीनुसार व्हीप अतिशय महत्त्वाचा असतो- सरन्यायाधीश चंद्रचूड
  • नव्या विधानसभेच्या अध्यक्षांनी (राहुल नार्वेकर) भारत गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीरित्या मान्य केला. एखाद्या राजकीय पक्षाचा व्हीप न पाळणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे, राहुल नार्वेकरांनी नेमलेले शिंदे गटाचे व्हीप आणि प्रतोद बेकायदेशीर- सरन्यायाधीश चंद्रचूड
  • विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकाराचा मुद्दा हा सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवला जाणार- सरन्यायाधीश चंद्रचूड

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड साडेअकरा वाजता सुनावणार निकाल

  • राज्यातील सत्तासंघर्षावर आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड हे सकाळी साडेअकरा वाजता निकाल सुनावणार आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुप्रीम कोर्टातून निर्णय येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आहे, पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी 'सर्वांना शुभेच्छा' देत हात जोडून निघून जाणं पसंत केलं आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा नेमक्या कुणाला होत्या?, असा सवाल उपस्थित होत आहे.

निकाल काहीही लागला तरी सरकार स्थिर असेल- बावनकुळे

  • सुप्रीम कोर्टातून काहीही निकाल आला तरी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार नसल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
  • सत्तासंघर्षावरील निकालासाठी सर्व पाच न्यायाधीशांमध्ये एकमत, थोड्याच वेळात येणार अंतिम निकाल

सकाळी साडेदहा वाजता सरन्यायाधीश निकालाचं करणार वाचन

  • सकाळी दहा वाजता सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होत असते. त्यामुळं साडेदहाच्या सुमारास सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड हे प्रकरणांच्या निकालाचं वाचन करणार आहे. खंडपीठाकडून फक्त सरन्यायाधीश हेच निकाल सांगणार असल्यामुळं प्रकरणातील निकाल हा सर्वसहमतीने येणार असल्याचं बोललं जात आहे.

ठाकरे गटाचे अनेक नेते मुंबईत दाखल

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. त्यामुळं मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाचे नेते दिल्लीसाठी रवाना

  • राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास निकाल येणार आहे. त्यापूर्वीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि खासदार राहुल शेवाळे हे वकिलांच्या टीमसोबत दिल्लीत रवाना झाले आहे.
  • काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुमची 'नरहरी झिरवळ', संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

त्या दिवशी नेमकं काय झालं होतं?

  • २० जून २०२२ रोजी राज्यसभा आणि विधानसपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तात्कालीन शिवसेनेचे गटनेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांनी बंड करत सूरतला निघून गेले. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्यानंतर पक्षातील अन्य २९ आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर तात्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्याची मागणी केली. त्यानंतर तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले, परंतु त्यापूर्वीच नैतिकतेच्या आधारावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

ठाकरे गेले अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले...

  • उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपने सत्तास्थापन केला. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने धक्कादायक तंत्र वापरत देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. त्यावेळी काहीसे नाखूश झालेल्या फडणवीसांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यानंतर गेल्या नऊ महिन्यात अनेकदा भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे.

बहुमत असेल तर सरकार पडणार नाही- अजित पवार

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. शिवसेनेतील १६ आमदार जर अपात्र ठरले तर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. परंतु आता जोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारला १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत सरकारला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील-फडणवीस

  • राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टातून निकाल येणार आहे. निकाल येण्यासाठी काही तासांचा कालावधी उरलेला असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point