Sanjay Raut: अदानी ही भाजपची रिझर्व्ह बँक; संजय राऊत यांनी अक्षरशः पिसे काढली
Saamana Rokhthok: सामना रोखठोकमधून शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
Shiv Sena MP Sanjay Raut Criticized BJP Over Adani: अदानी समूहाबद्दलचा हिंडेनबर्ग रिसर्च अहवाल समोर आल्यानंतर जगभरात खळबळ माजली. या अहवालामुळे गौतम अदानींना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. जगातील श्रीमंतांच्या यादीतही त्यांची घसरण झाली. यावरून विरोधकही आक्रमक झाले असून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. भाजपच्या नेत्यांकडून अदाणींची पाठराखण केली जात असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. अदानी ही भाजपची रिझर्व्ह बँक असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी सामन्याच्या रोखठोकमधून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. "मुळात गौतम अदाणी व त्यांच्या उद्योगाचे साम्राज्य तकलादू पायावरच उभे होते. अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या एका फुंकरीने ते कोसळले. त्याचा फटका देशाला बसला. अदानी यांच्या आर्थिक साम्राज्याचा मुखवटा ओढणे हा देशावरचा हल्ला असे आता सांगितले जात आहे. अदाणी म्हणजेच भारत असे आता बोलले गेले. हा भारतमातेचा अपमान", असंही संजय राऊतांनी म्हटले आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, "2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना अदानींच्या साम्राज्यावर हल्ला का झाला? याचे कारण एकच, अदाणी व मोदी. अदाणी व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू. भारतीय अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लूटमार सिद्ध होऊनही भाजप गप्प आहे. यामुळे ते सिद्धच झाले. अदाणी म्हणजे भाजप याचा अर्थ स्पष्ट आहे. अदाणी यांच्याकडे भाजपचा पैसा गुंतला आहे. तेच भाजपचे मुख्य अर्थ पुरवठादार आहेत. भाजपचा अर्थपुरवठा रोखण्यासाठीच अदानींवर हल्ला झाला! अदानींवरील हल्ला हा भाजपच्या 'रिझर्व्ह बँके'वर हल्ला आहे", असं खळबळजनक भाष्य राऊतांनी केलं आहे."
यापूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांचे शेअर वाचवण्यासाठी केंद्र सरकारकडून बाजारातील विशिष्ट लोकांना फोन करण्यात आल्याचा आरोप केला होता. “शेअर बाजारातील घसरणीमुळे केंद्र सरकार कोसण्याची शक्यता आहे. यापूर्वीही काही लोकांना जामीनासाठी बोलावण्यात आले होते. पण मला कोणाचेही नाव घेऊन आणखी पेच निर्माण करायचा नाही. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले, अशा स्थितीत काही लोकांना फोन करून हजार कोटींची गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले", अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर निशाणा साधला. मात्र, यावेळी त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांचे नाव घेतले नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.