मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात वादळ; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : देशाच्या राजकारणात वादळ; राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 24, 2023 03:08 PM IST

Rahul Gandhi Lok Sabha Membership cancelled : मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi (PTI)

Rahul Gandhi : मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात सुरत जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दुसरा धक्का बसला आहे. याच प्रकरणात त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं याबाबतची माहिती दिली आहे. या निर्णयामुळं देशाच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २३ मार्च २०२३ पासून कलम १०२(१)(ई) च्या तरतुदींनुसार त्यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ चा आधार या निर्णयासाठी घेण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी कर्नाटकातील एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी देशात पळून गेलेल्या आरोपींबद्दल बोलताना मोदी आडनावा विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून विदेशात पळालेले नीरव मोदी, ललित मोदी यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यावेळी 'सर्व चोरांची आडनावं मोदीच का असतात?,' असं ते म्हणाले होते. त्यांचा रोख अर्थातच नरेंद्र मोदी यांच्याकडं होता. त्यांच्या याच वक्तव्यास आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राहुल यांच्या वक्तव्यामुळं मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी केला होता.

पूर्णेश मोदी यांच्या प्रकरणावर सुनावणी करताना सुरत जिल्हा न्यायालायनं काल राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच, त्यांना जामीन मंजूर करत उच्च न्यायालयात जाण्याची मुभाही दिली आहे. मात्र, त्यानंतर आज त्यांना हा दुसरा झटका बसला आहे. काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी हे मागील काही काळापासून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे लढत आहेत. मोदी सरकार देशात फूट पाडत असल्याचा आरोप करत अलीकडंच राहुल यांनी देशभरात 'भारत जोडो यात्रा' काढली होती. या यात्रेस उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरलं होतं. राहुल यांच्या या आरोपांवर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर देणं टाळलं होतं. त्यानंतर राहुल यांनाच भाजपनं लक्ष्य केलं होतं. आजची कारवाई हा त्याचाच भाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग