मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fire Incident : अरुणाचलमध्ये अग्नितांडव, ७०० दुकानं बेचिराख; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Fire Incident : अरुणाचलमध्ये अग्नितांडव, ७०० दुकानं बेचिराख; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 25, 2022 03:24 PM IST

Fire Incident In Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये लागलेल्या आगीत तब्बल ७०० दुकानं जळून खाक झाल्याची घटना समोर येत आहे. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

Fire Incident In Arunachal Pradesh
Fire Incident In Arunachal Pradesh (HT)

Fire Incident In Arunachal Pradesh : संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. यावेळी फटाके वाजवताना अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातच आता अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरलगत असलेल्या नाहरलगुन शहरात भयंकर आग लागल्याची घटना समोर आली आहे. भीषण आगीत आतापर्यंत तब्बल ७०० दुकानं जळून खाक झाली असून या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, मात्र कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त नाहरलगुन शहरात काही तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी केली होती. याशिवाय काही लोकांनी शहरातील अनेक ठिकाणी दिवेही लावले होते. त्यामुळंच ही आग लागल्याचं बोललं जात आहे. आग लागलेल्या काही दुकानांमध्ये लाकडी बांबू भरलेले असल्यानं वेगानं आग पसरली व लगतची अनेक दुकानं आगीत भस्मसात झाली आहे. त्याचबरोबर काही दुकानांमध्ये गॅस सिलिंडरही होते, आगीमुळं त्यातही स्फोट झाल्यानं आगीनं उग्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भीषण आगीमुळं कोट्यवधींचं नुकसान...

अरुणाचलच्या नाहरलगुनमध्ये लागलेल्या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. याशिवाय सध्या मदत व बचावकार्य सुरू असल्यानं संपूर्ण आग विझवल्यानंतरच नेमकं किती नुकसान झालं आहे, याचा अंदाज लावता येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तेव्हा अग्निशमन दलाचे जवानच घटनास्थळी लवकर आले नाही, त्यामुळंच मोठं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नाहरलगुनमध्ये आग लागल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळंच ७०० दुकानं जळाली असून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाहरलगुन बाजार समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग