Manipur Landslide: लष्कराचा कॅम्प भूस्खलनात उद्ध्वस्त, दोघांचा मृत्यू
Manipur Landslide: मणिपूरमध्ये भूस्खलनात लष्कराचा कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
Manipur Landslide: मणिपूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलानाच्या घटना घडल्या आहेत. तुपुर रेल्वे स्थानकाजवळ (Tupul Railway Station) भूस्खलनाची दुर्घटना घडली असून यात लष्कराचा (Indian Army Camp) कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. यातून आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.
इम्फाळ आणि जिरीबामल यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाची बांधणी सुरू आहे. याच्या सुरक्षेसाठी जवानांचे एक पथक तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री तुपुल रेल्वे स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यातच अचानक भूस्खलन झाल्यानं अनेकजण मातीच्या ढिगाखाली गाडले गेले आहेत.
भूस्खलनाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिस दाखल झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहा यांनी ट्वीटरवर म्हटलं की, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बरेन सिंह आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली. बचावकार्य वेगाने सुरू असून एनडीआरएफची पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. इतर दोन पथके तिकडे पाठवण्यात येत आहेत असंही शहा यांनी म्हटलं.