India-China Conflict : तवांग चकमकीचे संसदेत पडसाद; सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधकांचा सभात्याग
India china clash : भारत व चीन सैनिकांदरम्यान तवांग येथे झालेल्या चकमकीचे पडसाद संसदेत उमटले. विरोधकांनी सभागृहातून वॉकआऊट करत सरकारचा निषेध नोंदवला.
नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील तवांग येथेभारत आणि चीनी सैनिकांमध्ये सीमेवर ९ डिसेंबर रोजी चकमक झाली होती. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. चीन चकमकीच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व तृणमूलच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती. आज प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, १९६२ मध्ये जेव्हा भारत-चीन युद्ध सुरू झाले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी १६५ खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत.
अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ वॉकआऊट केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला.
संबंधित बातम्या