Rahul Gandhi: भाजप, आरएसएसवाले 'जय सिया राम' का म्हणत नाहीत?; राहुल गांधींनी सांगितलं कारण
Rahul Gandhi on Jai Shri Ram: भाजप व आरएसएसचे लोक 'जय सिया राम' का म्हणत नाहीत, याचं कारण राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
Rahul Gandhi on Jai Shri Ram: भारत जोडो यात्रा जसजशी पुढं सरकते आहे, तसतसा यात्रेचा प्रतिसाद वाढत आहे. वाढत्या प्रतिसादाबरोबर राहुल गांधी यांच्या भाषणांना अधिकच धार येत असल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशातील आगर माळवा येथील सभेत नुकतीच याची प्रचिती आली. या सभेत राहुल यांनी आरएसएस, भाजपवर 'जय सिया राम' या घोषणेवरून निशाणा साधला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटले होते. त्यावरून भाजपनं त्यांना घेरलं होतं. राहुल यांनी भाजपच्या या टीकेचा समाचार घेतला. ‘भाजप, आरएसएसचे लोक फक्त जय श्री राम बोलतात. जय सिया राम म्हणत नाहीत. जय सीता रामचा अर्थ सीता आणि राम एकच आहेत असा होतो. पण आरएसएसमध्ये महिलांना स्थान नसल्यानं ते सीतेचं नाव घेत नाहीत. जय सिया राम या घोषणेत रामाबरोबर सीतेचाही सन्मान आहे. प आरएसएसवाले सीतेची पूजा करत नाहीत, असा आरोप राहुल यांनी केला.
‘महात्मा गांधी हे राम म्हणायचे कारण रामाचे आदर्श माझ्या जीवनात आले पाहिजेत, त्यांचं पालन केलं पाहिजे असं ते स्वत: मानायचे, असं राहुल गांधी म्हणाले. प्रभू रामचंद्रांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही, त्यांनी समाजाला जोडण्याचं काम केलं. त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि मजुरांना मदत केली. भाजप व आरएसएसवाले 'जय श्री राम’ ही घोषणा देत असले तरी ते रामाच्या आचार-विचारांवर चालत नाहीत, असं ते म्हणाले.
सीतेचाही आदर करा - राहुल गांधी
भाजपमध्ये महिलांना स्थान नाही. आरएसएस ही 'सिया राम'ची संघटना नाही. त्यांनी सीतेला कायम बाहेर ठेवलं आहे. त्यांनी सीतेचा आदर केला पाहिजे. जय श्री राम बरोबर त्यांनी जय सिया राम आणि हे राम असा जपही करावा, असा खोचक टोला राहुल यांनी हाणला.
विभाग