मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  फाळणीला नेहरूच जबाबदार, भाजपचा VIDEO तून निशाणा; काँग्रेसनेही दिलं प्रत्युत्तर

फाळणीला नेहरूच जबाबदार, भाजपचा VIDEO तून निशाणा; काँग्रेसनेही दिलं प्रत्युत्तर

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 14, 2022 02:40 PM IST

India Pakistan Partition: भाजपकडून फाळणीसंदर्भात एक व्हिडीओ तयार करून पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवण्यात आलं आहे. याला काँग्रेसनेही सोशल मीडियावरून उत्तर दिलं आहे.

भारत पाक फाळणीवरून भाजपचा नेहरूंवर निशाणा
भारत पाक फाळणीवरून भाजपचा नेहरूंवर निशाणा (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

India Pakistan Partition: स्वातंत्र्यावेळी झालेल्या देशाच्या फाळणीवरून भाजपने पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षीपासून भाजपकडून “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” पाळला जातो. यंदाचे दुसरे वर्ष असून भाजपने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामद्ये काँग्रेसवर निशाणा साधताना १९४७ मधील घटनांवर आधारीत हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. जवळपास ७ मिनिटांच्या या व्हिडीओत भारताच्या फाळणीला नेहरूच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वातील मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीची मागणी केल्यानंतर त्यासमोर नेहरू झुकल्याने त्यांना जबाबदार ठरवलं आहे.

भाजपने थेट नेहरूंवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले की, "१४ ऑगस्टला “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” पाळण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू हा सर्वात भयंकर, वेदनादायी ऐतिहासिक घटनांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर कऱणं हाच आहे. देशाच्या फाळणीसाठी आधुनिक काळातील सावरकर आणि जिन्ना यांचा प्रयत्न आजही सुरुच आहे.

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्टला घोषणा केली होती की, १९४७ मध्ये फाळणीवेळी भारतीयांच्या त्रासाची आणि बलिदानाची आठवण देशाला करून देण्यासाठी दरवर्षी १४ ऑगस्टला “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस” पाळला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळीसुद्धा याबाबत ट्विट केलं आहे.

भाजपच्या व्हिडीओमध्ये सिरील जॉन रॅडक्लिफ यांना दाखवलं आहे. त्यांच्याच नकाशाने पंजाब आणि बंगाल अर्धे अर्धे विभागले गेले. ज्या व्यक्तीला भारतीय संस्कृतीच्या वारशाबद्दल काही माहिती नाही त्यानं केवळं काही आठवड्यात भारताच्या फाळणीची परवानगी कशी दिली गेली असा सवालही उपस्थित केला गेला. पूर्ण व्हिडीओत नेहरूंची दृश्ये दाखवण्यात आली असून व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून फाळणीबाबत सांगण्यात आलं आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं की, "खरं हे आहे की सावरकरांनी दोन राष्ट्रांचा सिद्धांत दिला आणि जिन्नांनी तोच पुढे नेला. पटेल यांनी म्हटलं होतं की मला वाटतं की जर फाळणी स्वीकारली नाही तर भारत अनेक तुकड्यांमध्ये विभागला जाईल. फाळणीच्या या जखमांचा उपयोग द्वेष , भावना भडकावण्यासाठी होऊ नये. लाखो लोक स्थलांतरीत झाले आणि त्यांचे प्राण गेले. त्यांच्या बलिदानाला विसरू नये किंवा अपमान करू नये."

IPL_Entry_Point