PFI Raid Update : अमित शहांच्या आदेशानं ‘ऑपरेशन मिडनाइट’, वाचा पीएफआयवरील छाप्यांची इनसाइड स्टोरी
NIA PFI Raid Update : आज ईडी आणि एनआयएनं देशातील ११ राज्यांमधील १०६ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यावेळी तपासयंत्रणांनी १०० पेक्षा अधिक लोकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे.
NIA And ED Raid On Popular Front Of India : आज देशभरातील विविध शहरांमध्ये पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या कार्यालयांवर ईडी आणि एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत तपास यंत्रणांनी देशातील १०६ ठिकाणांवर रेड मारली असून शंभर पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं आहे. पीएफआय या संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचा आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु या कारवाईची योजना गृहमंत्री अमित शहा यांनी २९ ऑगस्टलाच आखली होती, तसंच या कारवाईला 'ऑपरेशन मिडनाइट' असं नाव देण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
एका न्यूज वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा यांनी २९ ऑगस्टला तपास यंत्रणांच्या काही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात त्यांनी पीएफआयच्या कारवायांबाबत माहिती मागवली. अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी या संघटनेविरोधात कारवाई करण्याचा प्लॅन आखला. यावेळी बैठकीत देशातील पीएफआयच्या नेटवर्कला संपवायचं आहे, यापुढे या पीएफआय या संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही कारवाया होऊ नये, यासाठी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्री अमित शहांनी तपास यंत्रणांना दिल्या होत्या.
समोर आलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी घेतलेल्या त्या बैठकीत हत्या आणि खंडणी वसूली प्रकरणातील आरोपींवर वॉच ठेवण्यावर चर्चा झाली होती. याशिवाय या संघटनेच्या लोकांवर एकाचवेळी छापेमारी करून त्यांना अटक करण्याच्या प्लॅनही अमित शहांच्याच बैठकीत आखण्यात आला होता. त्यानंतर तपास यंत्रणांनी पीएफआयनं अतिरेक्यांना केलेल्या फंडिंग प्रकरणाची माहिती गोळा केली, संबंधित राज्यातील पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर आज देशभरात छापेमारी करण्यात आली आहे.
राज्यात कुठे कुठे छापेमारी?
महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, मालेगाव, पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात एटीएस आणि एनआयएनं संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत २० आरोपींना अटक केली आहे.