Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाणार?, उद्धव ठाकरेंचं एका वाक्यात स्पष्ट उत्तर
Uddhav Thackeray Speech : आम्ही विरोधकांना माफ केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केल्यानंतर ठाकरे गट भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Uddhav Thackeray On BJP Shivsena Alliance : मनभेद आणि मतभेद आम्ही विसरलो आहोत, आम्ही विरोधकांना माफ केलं, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भाजपा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राजकीय युती करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत वृत्ताचं खंडन केलं आहे.
मुंबईतील माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा सोबत पॅचअप करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे?, भाजप नेत्यांच्या मनात काय आहे?, ते त्यांनाच विचारायला हवं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतच्या युतीच्या चर्चांना ब्रेक दिला आहे. त्यामुळं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना भाजपविरोधात लढणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम केलं जात आहे. भाजपात या नाही तर तुरुंगात जा, असं धोरण वापरलं जात असल्याचाही आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे.
भाजपात या नाही तर बुलडोझरला सामोरं जा, असा दम मध्यप्रदेशातील मंत्र्यानं दिला आहे. परंतु जनतेच्या मतांचा बुलडोझर भाजपवर चालल्याशिवाय राहणार नाहीये. हे सर्व जाणीवपूर्वक केलं जात असून विरोधकांना नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपासयंत्रणेचा ससेमिरा लावून विरोधकांना बदनाम करण्याचा डाव भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.