मुंबईतील करोना पॉझिटिव्हीटीचा दर ४० टक्क्यांवर; राजेश टोपे म्हणाले...
मुंबईसह राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on Corona) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Rajesh Tope on Corona Cases: मागील काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण वाढलं असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्त्वपूर्ण माहिती दिली. 'राज्यात रुग्ण वाढत असले तरी ही वाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर हा दिवसाला ४० टक्क्यांवर गेला आहे. मात्र, आरोग्य विभाग या रुग्णवाढीकडं लक्ष ठेवून आहे, अशा शब्दांत त्यांनी जनतेला आश्वस्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनता दरबार उपक्रमाला राजेश टोपे यांनी आज हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'राज्यात वाढणाऱ्या करोना रुग्णांमध्ये ओमायक्रॉन या व्हायरसचे व्हेरिएंट आढळून येत आहेत. अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.
‘करोना रुग्णांची वाढ ही मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रापुरता आहे. शिवाय, रुग्णालयात दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच आहे. 'खबरदारी म्हणून राज्यात टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आरोग्य विभाग सतर्क असून 'हर घर दस्तक' या सूचनेप्रमाणे आशा वर्कर आणि आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाची माहिती घेऊन लसीकरणाचं प्रमाण वाढवत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
पालकांना सूचना
'राज्यात शाळा सुरु झाल्या आहेत. १२ ते १८ या वयोगटातील मुलांचं लसीकरण झालं नसल्यास ते पूर्ण करून घेण्याच्या सूचना पालकांना तसेच शिक्षकांना करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं.
मुंबईत मागील २४ तासांत २,२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज एका करोना रुग्णााच मृत्यू झाला आहे. १७६४ जण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.