मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena Vs BJP: 'कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही'

Shiv Sena Vs BJP: 'कमळाबाईच्या मराठी दांडियाने शिवसेना इंचभरही हलणार नाही'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 28, 2022 10:34 AM IST

Saamana Editorial Slams BJP: नवरात्रीच्या दांडियाच्या माध्यमातून मराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांची शिवसेनेनं जोरदार खिल्ली उडवली आहे.

Shiv Sena
Shiv Sena

Saamana Editorial on BJP Marathi Dandiya: शिवसेनेत उभी फूट पाडण्याचा राजकीय डाव साधल्यानंतर आता मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता खेचून घ्यायची तयारी भाजपनं केली आहे. त्यासाठी उत्सवाच्या माध्यमातून मराठी व अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहीहंडी गणेशोत्सवानंतर आता भाजपनं मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन केलं आहे. भाजपच्या या प्रयत्नांची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे.

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवण्यात आला आहे. 'मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेनं छातीवर झेलला आहे. शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे २४ तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियानं इंचभरही हलणार नाही, असं अग्रलेखातून ठणकावण्यात आलंय.

'मुंबई महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही. लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले. हे भाजपच्या दांडियेकरांना इतक्या वर्षांत समजू नये काय? फक्त ‘दांडिये’ करून मुंबईवर शिवसेनेचं राज्य टिकलं नाही, असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. 'काही दिवसांपूर्वी कमळाबाईच्या प्रेरणेनं मुंबईत ‘मराठी कट्टा’ नामक एक अजब प्रकार सुरू झाला. त्याचं पुढं काय झालं, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

'दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचाच आहे व त्यासाठी त्यांचे हे नवे नवे उद्योग सुरू झाले आहेत. आज मुंबईचा ताबा घेण्याचे मनसुबे जे रचत आहेत त्यांनी मुंबईसाठी काय केले, याचा हिशोब द्यावा. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेनं स्वाभिमानानं जगायला शिकविलं. गर्वानं ‘मराठी’पणाची कवचकुंडलं दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत, असा संतापही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग