NCPvsBJP: बावनकुळे काय एक लाख कुळे आले तरी बारामती… राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाजपला उत्तर
Baramati Lok Sabha Constituency : काल बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती, आता त्याला माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jitendra Awhad vs Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पार्टीनं २०२४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी बारामतीत तब्बल तीन दिवसांचा दौरा केला होता. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत सभा घेऊन २०२४ मध्ये बारामती लोकसभा जिंकण्याचा दावा केला आहे.
त्यामुळं आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जिंतेंद्र आव्हाडांनी बावनकुळेंवर जोरदार निशाणा साधत म्हटलंय की, बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही, उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे. असं म्हणत आव्हाडांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना आडनावावरून टोला लगावला आहे.
आव्हाडांनी ट्विटमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना म्हटलंय की, १९९० नंतर शरद पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, असं विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं. त्यानंतर सातत्यानं खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही. आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत, विसर्जन करण्याची भाषा करत आहेत, हे सर्व त्यांचा पक्ष चर्चेत रहावं म्हणून केलं जात असल्याचा आरोप आव्हाडांनी भाजपवर केला आहे.
बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. ६० वर्षे प्रत्येक निवडणुकीचा फॉर्म शरद पवार याच मारूतीच्या समोर उभं राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?, असा सवाल करत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना टोला लगावला आहे.
२०२४ ला यांच्या पायाखालची वाळू सरकेल- बावनकुळे
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांना काय बोलायचं आहे, ते बोलू द्या. २०२४ ला कुणाच्या पायाखालची वाळू सरकते कोण उध्वस्त होतंय ते बघू. राष्ट्रवादीला असं आव्हान देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील, असंही ते म्हणाले.