Eknath Khadse : पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?; खडसेंचा CM शिंदेंना खोचक टोला
Eknath Khadse On Shinde Group : आमच्या जिल्ह्यात बाळासाहेबांच्या पुण्याईमुळं निवडून आलेले पाच आमदार शिंदे गटासोबत गेले, पण यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खडसेंनी शिंदे गटाला दिला आहे.
Eknath Khadse On Shinde-Fadnavis Govt : बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून आलेली लोक त्यांच्याच कुटुंबियांवर टीका करत आहे. तत्त्व आणि सत्त्व नसलेले लोक आज २०० आणि ५०० कोटींच्या गप्पा मारत असून पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर केली आहे. जळगावातील पाचोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात खडसे बोलत होते, त्यात त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
राज्यातील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. राज्यातल्या इतिहासात जेवढं घाणेरडं राजकारण झालं नसेल तेवढं आता होत आहे. राजकारणात खोक्यांची भाषा कधीही कुणीही केली नव्हती. हे सराकार पाडू ते सरकार पाडू, ही भाषा अलिकडच्या राजकारणात वाढत चालली असून ती योग्य नाही, असं म्हणत खडसेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आमच्या जिल्ह्यात बाळासाहेबांच्या पुण्याईमुळं निवडून आलेले पाच आमदार शिंदे गटासोबत गेले, पण यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे गटाला इशारा दिला आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील सर्व जागा जिंकायच्या आहेत. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व मिळालं असून त्यांच्या नेत्तृत्वात आम्ही मोठं यश मिळवू, असंही खडसे म्हणाले.